रत्नागिरी ः प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात असलेल्या आंजर्ले येथील समुद्रात सहा पर्यटक बुडाल्याची घटना शुक्रवारी (दि. 18) घडली. सहापैकी तिघांचा बुडून मृत्यू झाला, तर तीन जणांना वाचवण्यात यश आले आहे. हे सर्व पर्यटक पुण्यातील आहेत.
पुण्याच्या औंध येथील निहाल चव्हाण, अक्षय राखेलकर, उबेस खान, रोहित पलांडे, विकास श्रीवास्तव, मनोज गावंडे यांच्यासह 14 पर्यटक फिरण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात आले होते. हे पर्यटक शुक्रवारी दुपारच्या वेळी दापोली तालुक्यातील आंजर्ले येथील समुद्रकिनार्यावर गेले होते. पोहण्यासाठी ते पाण्यात उतरले. पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने हे सहाही पर्यटक पाण्यात बुडाले.
ही घटना किनार्यावर असलेल्या स्थानिकांच्या निर्दशनास आली. त्यामुळे तीन जणांना वाचवण्यात स्थानिकांना यश आले. बुडालेल्या सहा पर्यटकांपैकी तीन पर्यटकांचा या वेळी बुडून मृत्यू झाला. वाचवण्यात आलेल्या तीन तरुणांना सध्या दापोली येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दापोली पोलिसांनी या प्रकरणाची नोंद केली आहे.
Check Also
गव्हाण ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा
उलवे नोड : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित ग्रामसभा शुक्रवारी (दि.१) माजी …
RamPrahar – The Panvel Daily Paper