Breaking News

संदीप नाईक यांचे ठिय्या आंदोलन

उन्नत मार्गिका कामात ढिसाळपणाचा केल्याचा निषेध

नवी मुंबई ः बातमीदार

ऐरोली- काटई मार्गावर नवी मुंबईकरांसाठी मुंबईच्या दिशेने आणि काटईच्या दिशेने मार्गिका बांधण्याच्या कामांमध्ये एमएमआरडीए करीत असलेल्या चाल-ढकलीचा निषेध करण्यासाठी बुधवारी (दि. 2 मार्च) ऐरोली विधानसभा क्षेत्राचे प्रथम आमदार संदीप नाईक यांनी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले.

एमएमआरडीए बांधत असलेल्या या उन्नत पुलाचा उपयोग नवी मुंबईकरांना झालाच पाहिजे, या आग्रही भूमिकेतून संदीप नाईक यांनी एमएमआरडीएला पत्र लिहून दोन्ही बाजूला चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी मार्गिका ठेवण्याची मागणी केली होती. त्यानुसार याबाबतची कार्यवाही सुरू झाली होती. परंतु, हे काम करण्यात एमएमआरडीए चाल-ढकलपणा करीत असल्याचा आरोप संदीप नाईक यांनी केला. आमदार गणेश नाईक यांची बुधवारी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्यासमवेत झालेल्या बैठकीमध्ये संदीप नाईक यांनी आक्रमक भूमिका घेत, जोपर्यंत एमएमआरडीए लेखी देत नाही, तोपर्यंत ठिय्या सोडणार नाही, असे स्पष्ट केले. आयुक्तांनी या प्रश्नी तातडीने एमएमआरडीएचे प्रमुख गोविंदराज यांची पुढील आठवड्यात बैठक घेणार असल्याचे सांगितले.

या बैठकीत या मार्गिकांचे काम प्रत्यक्षात कधी सुरू होईल, कधी पूर्ण होईल याविषयी लेखी घेऊन कालबद्ध निर्माण कार्यक्रम आखण्यात येईल, असे आश्वासन संदीप नाईक यांना दिले.

  अघोषित पाणीकपात रद्द करा

मोरबे धरणामध्ये पुरेसा पाणीसाठा असताना महापालिका प्रशासनाने अलीकडेच शहरात पाणीकपात जाहीर केली होती. या विरोधात आमदार गणेश नाईक यांनी पत्र महापालिका प्रशासनाला दिल्यावर ही पाणीकपात प्रशासनाने रद्द केली. परंतु, काही अधिकारी कमी दाबाने पाणीपुरवठा करित आहेत. अघोषित पाणीकपात जर रद्द केली नाही तर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडू असा इशाराही या वेळी त्यांनी दिला.

Check Also

करिअरविषयक मार्गदर्शन सत्राला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्तसध्या जगात एआय तंत्रज्ञानावर आधारित सर्वाधिक संधी असल्यामुळे विद्यार्थ्यांनी एआयसोबत लवकरच परिचित …

Leave a Reply