कामकाज ठप्प, नागरिकांची गैरसोय
कर्जत : प्रतिनिधी
दोन वर्षांपासून पाठपुरावा करूनही न्याय मिळत नसल्याने रायगड जिल्ह्यातील महसूल कर्मचारी 4 एप्रिलपासून बेमुदत संपावर गेले आहेत. संपाचा आजचा नववा दिवस आहे. यामुळे जिल्ह्यातील, तालुक्यातील महसूल विभागातील कामकाज ठप्प झाले आहे.
आपल्या प्रलंबित मागण्यांची तड लावण्यासाठी महसूल कर्मचारी संघटनांनी 21 मार्च 2022पासून निदर्शने, काळ्या फिती लावून काम करणे, एक दिवसाचा लाक्षणिक संप अशी आंदोलने केली आहेत. तरीही राज्य सरकार त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे 4 एप्रिलपासून महसूल कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत.
राज्य महसूल कर्मचारी संघटना पदाधिकार्यांची 7 एप्रिल रोजी राज्य शासनासोबत मुंबई येथे बैठक झाली. बैठकीत झालेल्या चर्चेनुसार शासन मागण्यांसाठी ठोस निर्णय घेण्याचा मनस्थितीत नाही, असे दिसून आले होते. त्यामुळे आमच्या मागण्यांबाबत जोपर्यंत शासन निर्णय घेत नाही, तोपर्यंत आमचे हे आंदोलन, संप सुरूच राहणार आहे असे पदाधिकार्यांनी सांगितले होते.
आज (दि.12) संपाचा नववा दिवस आहे, कर्मचारी संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष केतन भगत, सरचिटणीस भूषण पाटील, कार्याध्यक्ष गोवर्धन माने यांनी कर्जत तहसील कार्यालयातील कर्मचार्यांची तसेच कर्जत उपविभाग अध्यक्ष संदीप गाढवे, तालुका अध्यक्ष रवी भारती यांची भेट घेतली व त्यांच्याशी चर्चा केली.
शासन जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य करीत नाही तोपर्यंत बेमुदत संप सुरूच राहणार. -केतन भगत, जिल्हाध्यक्ष, महसूल कर्मचारी संघटना