बीसीसीआयचा प्लान बी
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
देशात कोरोनाचे संकट अधिक गडद होत चालले आहे. अशात आयपीएलचे बायो-बबलमध्ये आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाली होती, तर काही खेळाडूंनी कोरोनाच्या भीतीपोटी स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यामुळे आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) टी-20 विश्वचषक स्पर्धेचे आयोजन कसे करणार, असा प्रश्न आहे. त्यासाठी या विश्वचषकाचे आयोजन यूएईला ठेवण्याचा विचार भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) केला आहे.
या वर्षी 18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबरदरम्यान आयसीसी टी 20 विश्वचषक स्पर्धा भारतात होणार आहे, मात्र कोरोना स्थिती पाहता हे आयोजन संकटात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे बीसीसीआयने प्लान बी तयार ठेवण्याची तयारी केली आहे. बीसीसीआयचे जनरल मॅनेजर धीरज मल्होत्रा यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली.
‘आपल्या देशात विश्वचषकाचे आयोजन व्हावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आमचे कोरोना स्थितीवर लक्ष आहे. या स्थितीवर आम्ही आयसीसीशी बोलत आहोत, तसेच आम्ही यूएईत स्पर्धेचे आयोजन करण्याची रणनीती आखत आहोत, मात्र यावर बीसीसीआय अंतिम निर्णय घेईल’, असे धीरज मल्होत्रा यांनी सांगितले.
मागच्या वर्षी कोरोना स्थितीमुळे बीसीसीआयने आयपीएलचे आयोजन यूएईत केले होते. त्यामुळे टी 20 विश्वचषकाचे आयोजन करण्यास कोणतीही अडचण येणार नाही, असं बीसीसीआयचे अधिकार्यांचे मत आहे.