Breaking News

नेरळमध्ये शांतता कमिटीची बैठक;ध्वनिप्रदूषण टाळण्याचे आवाहन

कर्जत : बातमीदार

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करीत असताना त्यांच्या विचारांची माहिती देणारी व्याख्याने आयोजित करावीत आणि प्रबोधन करावे, असे प्रतिपादन कर्जतचे पोलीस उपअधीक्षक विजय लगारे यांनी नेरळ येथे केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शासनाच्या निर्देशांबद्दल माहिती देण्यासाठी नेरळ पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत उपअधीक्षक लगारे उपस्थितांना मार्गदर्शन करीत होते. मिरवणुकीत डॉल्बी आणि डीजेमुळे ध्वनिप्रदूषण होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी या वेळी केले. सुरुवातीला किशोर गायकवाड, अ‍ॅड. उत्तम गायकवाड, दिनेश आढाव, विवेक पवार, जीवक गायकवाड, सचिन गायकवाड, राजू आढाव, तेजस गायकवाड, तसेच मंडळांच्या पदाधिकार्‍यांनी आपले जयंती उत्सवाबाबतचे नियोजन सांगितले. समन्वयातून जयंतीउत्सव साजरा झाला पाहिजे. या वेळी काढण्यात येणार्‍या सर्व मिरवणुका शांततेत रात्री 10 पूर्वी पूर्ण होतील याची काळजी घ्यावी, अशी सूचना उपअधीक्षक विजय लगारे यांनी केली.   नेरळचे पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर यांच्यासह नेरळ, मोहाचीवाडी, दहिवली, डिकसल, आसल, नांदगाव, शेलू, बोपेले येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव साजरा करणार्‍या मंडळांचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

Check Also

नितीन पाटील यांच्या रूपाने पनवेलला मिळणार पहिला आगरी समाजाचा महापौर

उपमहापौरपदासाठी प्रमिला पाटील यांचा अर्ज दाखल पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाकरिता होणार्‍या …

Leave a Reply