नव्याने रस्ते बनविण्याची नागरिकांची मागणी
रोहे : प्रतिनिधी
तालुक्यातील वरसे ग्रामपंचायत हद्दीतील भुवनेश्वर गावातील साईमंदिर ते निरलॉन कॉलनी आणि निरलॉन कॉलनी ते रॅप्टाकॉस कॉलनी या दोन रस्त्यांची दुरवस्था झाली असून हे दोन्ही रस्ते लवकरात लवकर दुरुस्त करण्याची मागणी होत आहे. भुवनेश्वरमधील साईमंदिर ते निरलॉन कॉलनी (कालवा रोड) आणि निरलॉन कॉलनी ते रॅप्टाकॉस कॉलनीपर्यंत असणार्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या मार्गावरील खड्ड्यांची समस्या भेडसावत असतानाच या रस्त्यांवर गतीरोधकही मोठ्या प्रमाणात आहेत. अनेक ठिकाणी खोदकाम केल्यानंतर त्या ठिकाणचे ते खड्डेसुध्दा अपुरे भरले जात आहेत. त्यामुळे या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या दोन्ही रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात रहदारी असून दुचाकी व चारचाकी वाहनांची वर्दळ असते. खड्डे चुकवताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. खड्ड्यात वाहने आदळत असल्याने विशेषत: दुचाकीचालकांना कमरेचा त्रास उद्भवू लागला आहे तसेच वाहने नादुरुस्त होण्याचे प्रकार वाढले आहेत. हा रस्ता महत्त्वाचा असल्याने नव्याने बनविण्याची नितांत गरज आहे. ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणात कामे होत असताना स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून हे रस्ते बनविण्याची मागणी होत आहे.