पनवेल : वार्ताहर
पर्यावरण दिनाचे औचित्य साधून जाणीव या सामाजिक सेवा संस्थेचा शुभारंभ सोहळा घरगुती स्वरूपात नवीन पनवेल येथे बांठीया विद्यालयात झाला. कार्यक्रमासाठी आलेले प्रमुख वक्ते निसर्ग मित्रचे डॉ. आशिष ठाकूर यांनी दैनंदिन जीवनातील पर्यावरण संतुलन कसे ठेऊ शकतो याचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आणि ज्येष्ठ विश्वस्त डॉ. सतीश उमरीकर यांनी मनोगत व्यक्त केले आणि मार्गदर्शनही केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने, महाराष्ट्र टाईम्सने गौरविलेल्या पनवेल मधील मनिष जोशी आणि अमोल साखरे या दोन पर्यावरण दुतांचा संस्थेतर्फे सन्मान करण्यात आला. त्याप्रसंगी त्यांनी त्यांच्या उपक्रमाबाबत उपस्थितांना माहिती दिली. कार्यक्रमासाठी असलेल्या प्रमुख पाहुणे यांना रोपटे देऊन सन्मान करण्यात आला तसेच सर्व उपस्थितांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष विजय गोरेगांवकर यांनी संस्थेची उद्दिष्ट्ये आणि भविष्यातील कार्यक्रम याबद्दल माहिती दिली. कार्यक्रमाच्या शेवटी पर्यावरण रक्षणाची शपथ घेण्यात आली. अक्कलकोटे यांनी स्वतः तयार केलेली शपथ उपस्थितांना दिली. पर्यावरण पूरक सोहळ्याद्वारे आज जाणीवचा शुभारंभ झाला. या सोहळ्यास पनवेल, ठाणे, मुंबई, नवी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील अनेक पर्यावरण प्रेमी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संस्थेतील अनेक मंडळी उपस्थित होती. या कार्यक्रमाच्या पूर्व संध्येला निसर्ग मित्र या संस्थेसोबत फळ झाडांच्या बियारोपण व वृक्षारोपण कार्यक्रमात जाणीवच्या काही सदस्यांनी सहभाग घेतला.
RamPrahar – The Panvel Daily Paper