Breaking News

युद्ध छेडल्यास भारतास योग्य प्रत्युत्तर देणार; इम्रान खानची दर्पोक्ती

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

भारताने युद्ध छेडल्यास पाकिस्तान उत्तर देण्याचा विचार करणार नाही, तर उत्तर देणार, अशी उघड धमकी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दिली आहे. भारतात सध्या निवडणुकीचा काळ आहे. त्यामुळे पाकिस्तानला धडा शिकवा अशी चर्चा सुरू आहे हे मी समजू शकतो, असेही त्यांनी या वेळी म्हटले आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यासंबंधी कोणताही पुरावा नसताना भारताकडून पाकिस्तानवर आरोप केला जात असल्याचे सांगत इम्रान खान यांनी आरोप फेटाळून लावत हात झटकले. इम्रान खान यांनी पत्रकार परिषद घेत पाकिस्तानची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच इम्रान खान यांनी मी भारतीय सरकारसाठी उत्तर देत आहे, असे सांगितले. कोणताही पुरावा नसताना पाकिस्तानवर आरोप करण्यात आले आहेत. या हल्ल्याचा पाकिस्तानला काय फायदा होणार आहे. पाकिस्तान स्थिरतेकडे जात असताना अशा गोष्टी पाकिस्तान करण्याचा विचार करणार नाही, असा कांगावाही त्यांनी या वेळी केला. हा नवा पाकिस्तान व नवी विचारसरणी आहे, असे या वेळी खान यांनी सांगितले. कोणत्याही प्रकारच्या चौकशीला आम्ही तयार असून जे पुरावे आहेत ते भारताने आम्हाला द्यावेत, अशी मागणी करत आम्ही कारवाई करू, असे खोटे आश्वासन खान यांनी दिले. या वेळी त्यांनी भारताशी कधीही चर्चा करायचे म्हटले की आधी दहशतवादावर चर्चा करण्याची मागणी केली जाते. आम्ही दहशतवादावर चर्चा करण्यास तयार आहोत, असे इम्रान खान यांनी या वेळी सांगितले.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply