Breaking News

कालवा सफाईच्या कामाला मुहूर्त सापडेना!

माणगावातील शेतकर्‍यांना पाण्याची प्रतीक्षा; रब्बी हंगामातील शेतीची कामे अडली

माणगाव : प्रतिनिधी

काळ प्रकल्पांतर्ग डोलवहाळ बंधार्‍याचे पाणी दरवर्षी 15 डिसेंबरदरम्यान डाव्या कालव्यातून माणगाव तालुक्यातील शेतीला सोडले जाते, मात्र या वेळी नोव्हेंबर महिना संपत आला तरी या कालव्यांच्या सफाईची कामे पाटबंधारे विभागाने अद्यापही हाती घेतली नाहीत. यंदा अतिवृष्टीमुळे  या कालव्यात मोठ्या प्रमाणात माती, दगड, गाळ साचला असून, शेवाळ व झाडे, झुडपे वाढली आहेत. या कालव्याच्या सफाईची कामे पाटबंधारे विभागाने अद्याप सुरु केली नाहीत. त्यामुळे रब्बी हंगामातील पिके घेणारे शेतकरी चिंतेत आहेत.

रोहे तालुक्यातील कुंडलिका नदीवर काळ प्रकल्पांतर्गत डोलवहाळ येथे बंधारा बांधण्यात आला आहे.1974 मध्ये या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले.1976 पासून प्रत्यक्ष सिंचन सुरु झाले. डोलवहाळ बंधार्‍याच्या डाव्या कालव्याच्या पाण्यावर माणगाव तालुक्यात उन्हाळी भात शेती व अन्य पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. दरवर्षी 15 डिसेंबर ते 15 एप्रिल या कालावधीत या कालव्यात पाणी सोडण्यात येते. तत्पूर्वी कालवा सफाई व दुरुस्तीची कामे केली जातात, मात्र नोव्हेंबर महिना संपत आला तरी पाटबंधारे विभागाने या कालव्यांच्या सफाईची कामे सुरू केलेली नाहीत. त्यामुळे माणगाव तालुक्यातील लाभार्थी शेतकरी कमालीचे अस्वस्थ झाले आहेत.

यांत्रिक विभागाकडून मशनरी उपलब्ध झाल्यानंतर कालव्याच्या सफाईचे काम जलद गतीने सुरु केले जाईल. -श्रीकांत महामुनी, अधिकारी, माणगाव पाटबंधारे उपविभाग

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply