Breaking News

रायगडावर 350वा शिवराज्याभिषेक सोहळा 1 व 2 जूनला होणार साजरा

मुख्यमंत्र्यांनी घेतला नियोजनाचा आढावा

मुंबई : प्रतिनिधी
राज्य शासनामार्फत 1 व 2 जून रोजी किल्ले रायगडावर 350वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जाणार आहे. स्वराज्याचा, स्वातंत्र्याचा प्रेरणा देणारा हा दिवस असून त्यानिमित्त राज्यात वर्षभर प्रत्येक जिल्ह्यात सांस्कृतिक कार्यक्रम, पोवाडे, शाहिरी स्पर्धा, महाराष्ट्रातील प्रमुख किल्ल्यांवर शिववंदना, जाणता राजा महानाट्याचे राज्यभर प्रयोग आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी (दि. 29) येथे दिली.
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या नियोजनाबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे आढावा बैठक झाली. त्या वेळी मुख्यमंत्री बोलत होते. या बैठकीस पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार सर्वश्री प्रशांत ठाकूर, भरत गोगावले, महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी, प्रकाश सुर्वे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव आनंद लिमये, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, माहिती व जनसंपर्क महासंचालक जयश्री भोज, रायगडचे जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांच्यासह शिवराज्याभिषेक समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. या ऐतिहासिक सोहळ्यात सर्वांनी उत्साहाने सहभागी होऊन इतिहासाचे साक्षीदार होण्याचे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी या वेळी केले.
शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त राज्यात वर्षभर विविध कार्यक्रमांच्या आयोजनासोबतच सांस्कृतिक कार्य विभागाने छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय अध्ययन केंद्र, आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय केंद्राची निर्मिती, राज्यात अकृषिक विद्यापीठस्तरावर छत्रपती शिवाजी महाराज अभ्यास केंद्र, तज्ज्ञ समितीमार्फत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी संबंधित साहित्य आणि संदर्भ साहित्याचे डिजिटायझेशन हे उपक्रम प्रस्तावित केले आहेत.
शिवराज्याभिषेक सोहळ्याला 350 वर्षे होऊन त्या घटनेचे महत्त्व आजही तितकेच आहे. तमाम मराठी जनांसाठी ही महत्त्वाची घटना आहे. या वर्षी 350वा शिवराज्याभिषेक सोहळा असल्याने त्याचे आयोजन राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागामार्फत करण्यात येत आहे. त्यामुळे रायगड जिल्हा प्रशासनाने त्यासाठी जय्यत तयारी करावी. सोहळ्यासाठी येणार्‍या शिवभक्तांची गैरसोय होणार नाही यासाठी काटेकोरपणे नियोजन करावे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
रायगडावर होणार्‍या ऐतिहासिक सोहळ्यानिमित्त रायगडावर रोषणाई करण्यात येणार असून त्यासाठी राज्य आणि केंद्र शासनाच्या पुरातत्व विभागाशी समन्वय ठेवावा कुठलीही अडचण येता कामा नये, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिल्या. सोहळ्याच्या दिवशी शिभक्तांसाठी मोफत बससेवा महाड ते पाचाड या दरम्यान सुरू करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
सोहळ्यासाठी येणार्‍या शिवभक्तांसाठी भोजन, पाणी, मंडप, आरोग्य सुविधा यांची चोख व्यवस्था प्रशासनाने करावी. गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच सोहळ्याच्या समग्र नियोजनासाठी रायगड जिल्हाधिकार्‍यांनी प्रत्यक्ष गडावर संबंधित लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी यांची बैठक घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

Check Also

‘प्रेम नगर’ है यह अपना….

हिंदी चित्रपटाने बायस्कोपपासून ओटीटीपर्यंत, सोळा एमएमपासून सत्तर एम.एम, सिनेमास्कोपपर्यंत, रस्त्यावरच्या पोस्टरपासून ते डिजिटल युगापर्यंत, मोनो …

Leave a Reply