कर्जत : प्रतिनिधी
वटपौर्णिमा शनिवार (दि. 3) उत्साहात साजरी झाली. सुटी असल्याने चाकरमानी महिला दुपारच्या सुमारास वटवृक्षाची पूजा करण्यासाठी बाहेर पडल्या. कडक उन्हाळा असल्याने सुहासिनी अगदी संध्याकाळपर्यंत मनोभावे वटवृक्षाची पूजा करीत होत्या.
यंदा विवाह सोहळे नेहमीप्रमाणे उत्साहात पार पडले. अगदी काल-परवापर्यंत विवाह होत होते. त्यामुळे वटपौर्णिमेसाठी नववधूंची संख्या मोठी होती. पारंपरिक वेशभूषा करून सुहासिनी वटवृक्षाला फेर्या मारण्यासाठी तयार होत्या. विविध कामांसाठी अनेक जुने वड तोडण्यात आल्याने सुहासिनींना वटवृक्षाची पूजा करण्यासाठी पायपीट करावी लागली, तर काही महिलांनी वडाच्या झाडाच्या फांद्या घरी आणून पूजा केली.
हल्लीच्या मोबाईलच्या जमान्यात काही सुहासिनींना सेल्फीचा मोह आवरता आला नाही, तर काहींनी अद्याप शाळा सुरू नसल्याने आपल्या लहान मुलांसह पूजेचा मुहूर्त साधला. ’सात जन्मी हाच नवरा मिळू दे’ अशी प्रार्थना करून वटपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.
Check Also
‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम
दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …
RamPrahar – The Panvel Daily Paper