Breaking News

लांबीचे काय हो? पिक्चरची खोली महत्त्वाची!

पिक्चरवाल्यांना वादविवादासाठी काहीही चालतं. आणि एकदा का वादाला तोंड फुटलं की फिल्मवाले, गॉसिप्सवाले त्यात काय काय, कुठून कशी भर घालतील काही सांगता येत नाही. काय तर म्हणे, संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ’अनिमल’ एकाच मध्यंतरचा असावा की दोन? का तर म्हणे, त्याची लांबी तीन तास एकवीस मिनिटे म्हणजेच एकशेएक्याण्णव मिनिटे इतकी आहे. जुन्या रिळाच्या हिशोबात वीस रिळे होतात. रमेश सिप्पी दिग्दर्शित ’शोले’ (1975)ची लांबी तीन तास चोवीस मिनिटांची असूनही ’विना तक्रार, विना कंटाळा’ अनेकांनी अक्षरश: पुन्हा पुन्हा पाहत. काहीजण आजही एकाद्या उपग्रह वाहिनीवर (जाहिरातींसह चार तास) अथवा यू ट्यूबवर पुन्हा पुन्हा ’शोले’ पाहतात. आपल्या देशातील चित्रपट संस्कृतीतील अनेक वैशिष्ट्यांतील एक म्हणजे एकदा आवडलेला पिक्चर पुन्हा पुन्हा पाहणे. मग त्याची लांबी कितीही का असेना? आवडलेल्या पिक्चरसाठी कितीही वेळ देण्याची आपल्या पब्लिकची मानसिक तयारी असते. ’शोले’ आणि ’निमल’ या चित्रपटात काळाचा खूपच मोठा फरक आहे. ’शोले’ तसा आजही विविध पद्धतीने सुरूच आहे. त्याचा फर्स्ट रन अर्थात सत्तरच्या दशकात सेन्सॉर सर्टिफिकेटवर अठरा, एकोणीस रिळ असं वाचलं रे वाचलं की हाऊसफुल्ल थेटरात टाळ्या शिट्ट्यांचा जणू पाऊस पडे. नेहमीच्या तिकीटात जास्त पिक्चर पाहायला मिळणार असाच तो जणू आनंद असे. मल्टिप्लेक्स युगात एकशेसाठ मिनिटांचा चित्रपट म्हणजे दिग्दर्शकाने जणू एकादी गोष्ट मांडताना जास्त वेळ घेतल्याची मुव्ही लव्हर्सची भावना, पण खरंच तसं असते काय? दिग्दर्शक आशुतोष गोवारीकरच्या ’जोधा अकबर’ची लांबी दोनशे चौदा मिनिटे होती आणि त्यावरून चित्रपटसृष्टीत व मीडियात ’फार लांबी आहे’ अशी कुजबुज, कुरकूर झाली. त्याच वेळेस आशुतोष गोवारीकरची एका फिल्मी मुहूर्तात भेट झाली असता तो मला म्हणाला, एखादी गोष्ट तपशीलवार आणि रंगवून सांगितली की ती अधिक प्रभावी ठरते. समोरच्यापर्यंत पोहचते. त्यामुळे ती तशीच मांडायला हवी. आशुतोष गोवारीकरच्या या म्हणण्याशी मी सहमत झालो. त्यानेच दिग्दर्शित केलेल्या ’लगान’ची लांबी दोनशे चोवीस मिनिटे आहे. त्याच्या थीमनुसार ते परफेक्ट होते. मध्यंतरानंतर क्रिकेट सामन्यातून चित्रपट आकार घेत घेत जातो, त्यासाठी भुवन (आमिर खान) खेडूतांमधून अतिशय कष्टाने क्रिकेट संघ तयार करतो आणि मग क्रिकेट शिकण्यापासून सांघिक भावना निर्माण करण्यापर्यंत बरेच काही चित्रपटात घडते आणि तब्बल दीड दोनशे वर्षांपूर्वीच्या खडूस इंग्लिश संघाचा पराभव करतो. हे सगळं अनेक छोट्या छोट्या गोष्टीतून पडद्यावर येत जाते म्हणजे वेळ लागणारच आणि चित्रपट रसिकांनी ’या चित्रपटातील क्रिकेटचा खेळ छान एन्जॉय केल्याने पिक्चर हिट झाला.’ ऑस्करमध्ये विदेशी चित्रपट विभागात नामांकन मिळण्यातही ही लांबी कुठेच आडवी आली नाही. थीमनुसार चित्रपटाची लांबी असावी हा अलिखित नियमच. आशुतोष गोवारीकर ’व्हॉटस युवर राशी’ या चित्रपटात दोनशे अकरा मिनिटात पकड घट्ट करु शकला नाही. याचं कारण एकच एखाद्या मालिकेचा विषय त्याने चित्रपटात साकारला. त्याच्या ’स्वदेश’ची दोनशेदहा मिनिटाची लांबी थीमनुसार परफेक्ट. आपल्या देशातील ग्रामीण भागातील वास्तव त्यात त्याने मांडले. तेथील जीवनाचा संथ वेग चित्रपटात आपोआप आला. येथे दिग्दर्शक दिसतो म्हणूया. चित्रपटाच्या लांबीच्या या गोष्टीत आपल्या देशातील पहिल्या दोन मध्यंतरचा चित्रपट ’संगम’ विशेष उल्लेखनीय. आर.के. फिल्म बॅनरचा हा पहिला रंगीत चित्रपट. राज कपूर दिग्दर्शित या चित्रपटात प्रेम त्रिकोणाची गोष्ट. दोन जिवलग मित्र (राज कपूर व राजेंद्रकुमार) एकाच युवतीच्या (वैजयंतीमाला) प्रेमात पडतात. त्यातला रोमान्स, समज गैरसमजातील नाट्य, गीत, संगीत व नृत्य यांच्या केमिस्ट्रीत भरपूर युरोप दर्शन. हा 1964चा चित्रपट म्हणजे साठ वर्ष होताहेत. त्या काळात दोनशे अडतीस मिनिटांचा चित्रपट म्हणजे अबब इतका मोठा पिक्चर म्हणजे पटकथेत आणि दिग्दर्शनात तसे ’दाखवण्यासारखे’ काही हवे. पब्लिक उगाच पडद्यावर डोळे लावून बसत नाहीत. मुंबईतील डॉ. भडकमकर मार्गावरील अप्सरा चित्रपटगृहाचे उदघाटन ’संगम’ने झाले. चित्रपटाच्या नियमित वेळा होत्या दुपारी अकरा, साडेतीन आणि रात्री आठ. आणि रसिकांनी दोन्ही मध्यंतर एन्जॉय केला. असा पहिलाच अनुभव म्हणून ते सुखावले. या यशापासून जणू खुद्द राज कपूरचीच महत्त्वाकांक्षा जागी झाली आणि त्याने तब्बल सहा वर्ष खर्च करुन दोन मध्यंतरचा चित्रपट निर्माण केला. राज कपूरसारखे ’चित्रपट हाच आपला श्वास मानणारे दिग्दर्शक’ चित्रपटाच्या लांबी वा रुंदीपेक्षा खोली महत्त्वाची मानत. चित्रपटाची खोली खूपच महत्त्वाची आहे, आपल्याला रसिकांचे मनोरंजन करायचयं हेच त्यांचे लक्ष. सुरुवातीला म्हणजेच पहिल्या ट्रायलला या चित्रपटाची लांबी चार तास आणि 43 मिनिटे (दोन मध्यंतर) अशी इतकी होती. हा चित्रपट प्रदर्शित करताना तो चार तास नऊ मिनिटे अर्थात दोनशे एकोणपन्नास मिनिटे (दोन मध्यंतर) अशा अवधीने पडद्यावर आला, पण फस्ट डे फर्स्ट शोपासूनच तो पडला पडला, बोअर है अशी जोरदार आवई उठली आणि मग त्याची लांबी कमी करुन ती 178 मिनिटे (एक मध्यंतर) अशी करण्यात आली. तरीदेखील तीन तास. हा चित्रपट रसिकांना न आवडल्याने खरोखरच पडला की राज कपूरच्या व्यावसायिक शत्रूंनी तो पाडला याची आजही चर्चा सुरू आहे. हेदेखील एक प्रकारचे यशच. म्हणजेच मुद्रित माध्यम ते डिजिटल युग असा ’जोकर पडला की पाडला’ अशी चर्चा सुरूच आहे. त्यावर ’फोकस’ टाकला जात आहे. विशेष म्हणजे, यू ट्यूबवर मूळ दोन मध्यंतरचा म्हणजेच चार तास नऊ मिनिटे लांबीचा चित्रपट चक्क आहे.
आवर्जून पहा. रोमान्स आणि सर्कस, सेक्स आणि गीत संगीत यांचा छान मेळ घातलाय. विशेष उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, आर.के. फिल्मच्या वतीने त्या काळातील नियमानुसार दहा वर्षांनी पुन्हा सेन्सॉर करण्यात आला असतानाच तो मूळ रूपातच सेन्सॉर करून घेतला आहे. आपल्या चित्रपटावरचे निस्सीम प्रेम, अभिमान आणि विश्वास असावा तर तो असा आणि अस्सल फिल्म दीवाने आवर्जून वेळ काढून मूळ ’मेरा नाम जोकर’ अगदी आवर्जून यू ट्यूबवर पाहताहेत.
या चित्रपटाचे लेखन के. ए. अब्बास यांचे आहे तर शैलेन्द्र, हसरत जयपुरी, नीरज, प्रेम धवन, शैली शैलेन्द्र आणि इंदिवर यांच्या गीतांना शंकर जयकिशन यांचे संगीत आहे. जीना यहां मरना यहां इसके सिवा जाना कहां, कहता है जोकर सारा जमाना, जाने कहा गये वो दिन, ऐ भाई जरा देख के चलो, दाग न लग जाए ही गाणी आजही लोकप्रिय आहेत. या चित्रपटात राज कपूर, मनोजकुमार, सिम्मी, अचला सचदेव, ऋषी कपूर, धर्मेंद्र, दारा सिंग, पद्मिनी, केईना रबिआनकिना, राजेंद्रकुमार, ओम प्रकाश, आगा, राजेन्द्रनाथ, सुंदर, मुक्री, मारुती, पोल्सन, फजल खान इत्यादींच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे मुंबईतील मेन थिएटर नॉव्हेल्टी होते. अतिशय दणदणीत पब्लिसिटीने हा चित्रपट प्रदर्शित झाला. इतक्या दणदणीत पब्लिसिटीने हा चित्रपट प्रदर्शित झाला की या चित्रपटापासून मुंबईतील ’बेस्ट’ बसला या चित्रपटाच्या पोस्टरने रंगवले होते. कालांतराने रणधीर कपूरने काही मुलाखतीत याच चित्रपटावरून त्याला प्रश्न करताच उत्तर दिले, आमच्या चित्रपट निर्मिती संस्थेचा सर्वाधिक यशस्वी ’मेरा नाम जोकर’ आहे. म्हणजेच त्या चित्रपटाने रिपिट रन इत्यादीत रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळवला. तात्पर्य, फर्स्ट रनला चित्रपट अपयशी ठरला म्हणजे त्याचा शो संपला, खेळ अर्धवट राहिला असे होत नाही, तर चित्रपट दर्जेदार असेल तर तो त्यानंतरही यश प्राप्त करीत असतो. चित्रपटाच्या जगाची ही गोष्ट अगदीच वेगळी म्हणायची. चित्रपटाच्या लांबीच्या या गोष्टीत राजश्री प्रॉडक्सन्स निर्मित व सूरजकुमार बडजात्या दिग्दर्शित ’हम आपके है कौन’ची लांबी दोनशे सहा मिनिटे इतकी. मला आठवतय, मुंबईतील आम्हा चित्रपट समीक्षकांना लिबर्टी थिएटरची फर्स्ट डे फर्स्ट शोची तिकीटे दिली होती (संपूर्ण मुंबईत या एकाच चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यामागे व्यावसायिक रणनीती होती.) ’गीत संगीत व नृत्यातून बोलणारा’ हा चित्रपट एन्जॉय करीत असतानाच फर्स्ट इंटरमिशन असे पडद्यावर आले. म्हणजे हे पहिले मध्यंतर असून आणखी एक मध्यंतर आहे हे लक्षात आले आणि तासाभरात दुसरं मध्यंतर आले. पाचव्या दिवशीच थोडी लांबी कमी करून एक मध्यंतर केल्यावर चित्रपट आणखी प्रभावी ठरला आणि लिबर्टीती एकशेदोन आठवड्यांचा खणखणीत मुक्काम केला. सुभाष घई दिग्दर्शित ’सौदागर’ही तब्बल दोनशे तेरा मिनिटांचा जबरदस्त मसालेदार मनोरंजक चित्रपट. अनेक व्यक्तिरेखा आणि मूळ कथानकात अनेक उपकथानके अशी त्यात सांगड. जनसामान्यांचे भरपेट मनोरंजन करण्याची जणू ही हौस मौज. जे.पी. दत्ता दिग्दर्शित ’एलओसी कारगिल’ची लांबी तब्बल दोनशे पंचावन्न मिनिटे इतकी. युद्धाची तयारी, युद्धाचा थरार यात चित्रपट थरारक झाला तरी दिग्दर्शक जे.पी. दत्तावर ’बॉर्डर’च्या यशाचा हॅन्गओव्हरच दिसला. रसिकांनी चित्रपट नाकारला. दिग्दर्शक अनुराग कश्यपने ’गॅन्ग्स ऑफ वासेपूर’ अतिशय तपशीलवार साकारताना लांबीवर कोणतेच नियंत्रण ठेवले नाही. अनेक व्यक्तिरेखा आणि छोट्या छोट्या गोष्टीतून चित्रपट रंगवला. तो झाला तीनशे नऊ मिनिटांचा. म्हणजेच दोन मध्यंतर हवीत. त्यापेक्षा त्याने पहिला भाग आणि त्याचा सिक्वेल असे केले. रसिकांना ते आवडले हे जास्त महत्त्वाचे. एक प्रकारे एकच पूर्ण चित्रपट पाह्यला दोनदा तिकीट काढले म्हणायचे. पिक्चरची लांबी प्रकरण दक्षिणेकडील प्रादेशिक भाषेतील चित्रपट हिंदीत डब होण्याच्या ट्रेण्डमध्येही कायम. जणू मूळ तमिळ वा तेलगू चित्रपट लांबीने मोठे तेवढेच मनोरंजन मोठे असं वातावरण. पहिला ’बाहुबली’ आणि दुसरा ’बाहुबली’ मिळून तब्बल तीनशे सतरा मिनिटांचा जबरदस्त फॅण्टसी ड्रामा. पडद्यावरच्या विश्वात रसिक रमून गेले. ’आरआरआर’ची लांबी एकशे एकोणनव्वद मिनिटे. थरारक क्शन आणि भरपूर व्हीएफएक्सने आपण या चित्रपटाला इतका वेळ कधी बरे दिला हे लक्षातच येत नाही. अधिकची लांबी एखाद्या चित्रपटाच्या पथ्यावरही पडते. मोठ्या शहरांत हे लांबी प्रकरण यशस्वी ठरते. छोट्या शहरात आणि ग्रामीण भागात ’रिळांच्या युगात’ या लांबीवर स्थानिक थिएटरवालाच कात्री चालवे. तेथे ’दिवसा चार खेळ’ ही थिएटर संस्कृती. बारा, तीन, सहा व नऊ अशा ’फिक्स्ड वेळा’. त्यात बसेल तेवढाच पिक्चर आम्ही दाखवू असाच जणू रोखठोक बाणा. पब्लिकने मूळ चित्रपटातील काय कापलयं, काय ठेवलयं याची चिंता न करताच पिक्चर एन्जॉय केलीत. अनेक तालुक्यात वा गावांत रात्रीचा खेळ संपल्यावर रिक्षा/ सितारा/टमटम पकडायची घाई, ते कुठे हो जास्त लांबीचे पिक्चर पाहत बसणार? लांबलचक पिक्चरच्या गोष्टी शहरापासून लांब लांब गेल्यावर बदलत जातात…                                                                                         – दिलीप ठाकूर चित्रपट समीक्षक

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply