Breaking News

हिंदुस्थानला ‘अच्छे दिन’ आणण्याची जबाबदारी आता महाराष्ट्राच्या या ‘अष्टप्रधान’ मंत्र्यांची!

सतराव्या लोकसभेसाठी भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेला तब्बल 75 दिवसांचा ‘राष्ट्रीय महोत्सव’ यथासांग पद्धतीने यशस्वीरीत्या पार पडला. ‘खोटं बोल पण रेटून बोल’ या पद्धतीने प्रचार करणारे जबरदस्त तोंडघशी पडले आणि देशाला महासत्ता बनविण्यासाठी कंबर कसून कामाला लागलेले भारतीय जनता पक्ष, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम ही महाराष्ट्रातली महायुती आणि पर्यायाने राष्ट्रीय पातळीवरच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीने घवघवीत यश संपादन करीत सतराव्या लोकसभेत 543 पैकी 353 खणखणीत जागा पटकावल्या.

मैं, नरेंद्र दामोदरदास मोदी, ईश्वरकी शपथ लेता हूं की… अशा खणखणीत शब्दांत नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती महामहिम रामनाथ कोविंद यांच्याकडून पंतप्रधानपदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली. पंतप्रधान मोदी यांच्या समवेत आठ्ठावन्न मंत्री आणि राज्यमंत्री यांनी शपथ घेतली. गुरुवार, 30 मे 2019 रोजी सायंकाळी 7 वाजता नवी दिल्ली येथील रायसीना हिलच्या राष्ट्रपती भवनातल्या विस्तीर्ण प्रांगणात सुमारे दोन तास चाललेला हा शपथविधी सोहळा हा ऐतिहासिक, अभूतपूर्व आणि डोळ्यात साठवून ठेवण्यासारखाच होता. काँग्रेस पक्षाचा दणदणीत पराभव होऊनही श्रीमती सोनिया गांधी, राहुल गांधी, डॉ. मनमोहन सिंग, गुलाम नबी आझाद आणि त्यांचे सहकारी या शपथविधी समारंभाला आवर्जून उपस्थित होते. हिंदुस्थानच्या निकोप लोकशाहीचे हे एक सुलक्षणच म्हणावे लागेल. बुजूर्ग नेते लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज, उमा भारती, सुमित्रा महाजन, राम नाईक, योगी आदित्यनाथ, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, आनंदीबेन पटेल, रतन टाटा, मुकेश अंबानी आणि नीता अंबानी, विविध देशांचे प्रमुख अशा सुमारे आठ हजार मान्यवर या सोहळ्याचे साक्षीदार बनले. सायंकाळी 7 वाजून 3 मिनिटांनी मैं, नरेंद्र दामोदरदास मोदी, ईश्वर की शपथ लेता हूं की… असा आवाज आसमंतात घुमला आणि नरेंद्र मोदी हे दुसर्‍यांदा हिंदुस्थानचे पंतप्रधान बनले. वरिष्ठ नेते राजनाथ सिंह, अमित शाह, नितीन गडकरी, निर्मला सीतारामन, स्मृती इराणी, प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल, अरविंद सावंत, रावसाहेब दानवे, रामदास आठवले आणि संजय धोत्रे यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली.

अठ्ठावन्न मंत्र्यांमध्ये 24 मंत्री, 24 राज्यमंत्री आणि नऊ स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री आहेत. या मोदी सरकार-2 मध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला सात+एक अशी आठ मंत्रिपदे आली आहेत. नितीन जयराम गडकरी, पीयूष वेदप्रकाश गोयल, प्रकाश केशव जावडेकर, अरविंद गणपत सावंत हे चार मंत्री, रावसाहेब दादाराव दानवे पाटील, रामदास बंडू आठवले, संजय शामराव धोत्रे हे राज्यमंत्री नियुक्त करण्यात आले आहेत. केरळचे भारतीय जनता पक्षाचे नेते श्री. व्ही. मुरलीधरन हे महाराष्ट्र विधानसभा सदस्यांमधून राज्यसभेत निवडून आलेले असल्याने तांत्रिकदृष्ट्या ते महाराष्ट्राचे म्हणावे लागतील. या अर्थाने महाराष्ट्राचे सात+एक असे आठ मंत्री आहेत आणि त्यामुळेच महाराष्ट्राला केंद्रात ‘छप्पर फाडके’ प्रतिनिधित्व मिळाले आहे. या सर्वच मंत्र्यांना जी खाती देण्यात आली आहेत, त्यावरून हिंदुस्थानला ‘अच्छे दिन’ आणण्याची जबाबदारी महाराष्ट्राच्या या ‘अष्टप्रधान’ मंत्र्यांवर आहे. भारतीय जनता पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन जयराम गडकरी हे मोदी सरकार-एक मध्ये ही होते आणि त्यांनी आपल्या कामामुळे देशपातळीवर चांगला ठसा उमटविला आहे.

1995-1999 या कालावधीत नितीनभाऊ हे सार्वजनिक बांधकाम मंत्री होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईत 55 उड्डाण पूल, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, वांद्रे-वरळी सागरी सेतू ही ठळक आणि वाखाणण्याजोगी कामे झाली. त्यांचे मार्गदर्शन बिहारमध्ये सुद्धा घेण्यात आले होते आणि तिथे गंगा नदीवर साडेपाच किलोमीटर लांबीचा पूल उभारण्यात आला आहे. केंद्रात मंत्री होताच त्यांनी सुमारे एक लाख किलोमीटर लांबीचे महत्त्वाचे रस्ते उभारण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले. इतकेच नव्हे तर गुजरातमध्ये नर्मदा नदीवर वांद्रे-वरळी सारखाच पूल उभारला आहे. अनेक राज्य महामार्गांचे राष्ट्रीय महामार्गात परिवर्तन केले. त्यांना आधुनिक भारताचे विश्वेश्वरय्या म्हणून जर म्हटले, तर ती अतिशयोक्ती ठरू नये. आतासुद्धा नितीन गडकरी यांना रस्ते वाहतूक, महामार्ग, सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योग ही महत्त्वाची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोपविली आहे. पुण्याचे प्रकाश केशव जावडेकर हे भारतीय जनता पक्षाचे एक सुसंस्कृत नेते आहेत. त्यांनी आधी महाराष्ट्र भाजपचे आणि नंतर भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून चांगली कामगिरी बजावली आहे.

मोदी सरकार-एक मध्ये शिक्षण मंत्री म्हणून आपला ठसा उमटविला, तसेच माहिती आणि प्रसारण मंत्री म्हणूनही त्यांनी चागली कामगिरी बजावली आहे. योगायोग म्हणजे माहिती व प्रसारण हे केंद्रीय मंत्रिपद आणखी एकदा पुण्यातील नेत्याकडे आले आहे. काही वर्षांपूर्वी बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ यांच्याकडे हे खाते असायचे आणि विठ्ठलराव गाडगीळ यांच्यासाठीच जणू हे खाते निर्माण करण्यात आले आहे की काय असे वाटावे, इतके चांगले काम त्यांनी केले होते. आता मोदी सरकार-दोन मध्ये सुद्धा प्रकाश जावडेकर यांच्याकडे पर्यावरण, वन आणि हवामान बदल, माहिती आणि प्रसारण हे खाते देण्यात आले आहे. भारतीय जनता पक्षाचे एकेकाळी राष्ट्रीय कोषाध्यक्ष पद भूषविलेले माजी खासदार वेदप्रकाश गोयल आणि माजी आमदार चंद्रकांता गोयल यांचे चिरंजीव पीयूष वेदप्रकाश गोयल यांनी मोदी सरकारमध्ये संकटमोचक म्हणून काम केले आहे. ‘जिथे कमी तिथे आम्ही’ या न्यायाने पीयूष गोयल यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात रेल्वे, अर्थ अशी महत्त्वाची खाती सांभाळली आहेत. आताही मोदी सरकार-दोन मध्ये रेल्वे, उद्योग आणि वाणिज्य ही खाती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोपविली आहेत.

शिवसेना उपनेते, झुंजार कामगार नेते, अभ्यासू आमदार आणि आता उत्कृष्ट संसदपटू हा पुरस्कार पटकावलेले अरविंद गणपत सावंत यांच्याकडे अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम ही खाती आली आहेत. हे खाते कमी महत्त्वाचे अजिबात नाही, म्हटलं तर या खात्यात काम करण्यासारखे खूप आहे. कदाचित महाराष्ट्रासाठीच हे खाते निर्माण करण्यात आले आहे की काय असे वाटावे. कारण डॉ. मनोहर गजानन जोशी, प्रफुल्ल पटेल, बाळासाहेब विखे-पाटील, विलासराव देशमुख, अनंत गंगाराम गीते या महाराष्ट्रातील नेत्यांनी हे खाते सांभाळले आहे. डॉ. मनोहर जोशी आणि विलासराव देशमुख यांनी या खात्यावर चांगली पकड बसविली होती. एचएमटी घड्याळ बनविणारा कारखाना असो की भारत हेवी इलेक्ट्रॉनिक लिमिटेड (भेल) या उद्योगांना या मंत्र्यांनी प्रकाशात आणले. त्यामुळे शिवसेनेला ‘कमी महत्त्वाचे खाते’ असं म्हणून टीका करण्याची काहीही आवश्यकता नाही. अरविंद सावंत हे नावाजलेले कामगार नेते असून आता त्यांच्याकडे अवजड उद्योग व सार्वजनिक कंपन्या हे खाते आले असल्याने ते आपल्या या खात्याला येत्या पाच वर्षात निश्चितच न्याय देऊ शकतील. रावसाहेब दानवे यांच्याकडे ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण; रामदास आठवले यांच्याकडे सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण; संजय धोत्रे यांच्याकडे मनुष्यबळ विकास, दूरसंवाद, इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान ही खाती देण्यात आली असून ही खातीही महत्त्वाची आहेत.

महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठविण्यात आलेले व्ही. मुरलीधरन (वेल्लमवेल्ली मुरलीधरन) यांच्याकडेही परराष्ट्र व्यवहार आणि संसदीय कामकाज ही महत्त्वाची खाती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुपूर्द केली आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानानुसार आपला देश आणि देशाचा कारभार चालतो. भारतीय राज्यघटनेने पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांना अमर्याद अधिकार दिले आहेत. देशपातळीवर पंतप्रधान आणि राज्यपातळीवर मुख्यमंत्री हे कामकाज करीत असतात आणि एक व्यक्ती देश आणि राज्य चालवू शकत नसल्याने त्यांच्या मदतीला मंत्रिमंडळ असते अर्थात त्या सर्व मंत्र्यांना पंतप्रधान आणि मुख्यमंत्री हे मार्गदर्शन करीत असतात. त्यामुळे केवळ अर्थ, गृह, संरक्षण, परराष्ट्र, महसूल हीच नव्हे तर सर्वच खाती महत्त्वाची आहेत. त्यामुळेच या देशात नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील ‘अच्छे दिन’ आणण्याची खरी जबाबदारी महाराष्ट्राच्या सात+एक=आठ मंत्र्यांची आहे.

नरेंद्र मोदी यांनी 2014 साली ‘सबका साथ, सबका विकास’ ही घोषणा दिली होती. आता 2019 साली भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीने ऐतिहासिक, अभूतपूर्व यश नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संपादित केल्यानंतर संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात ‘सबका साथ, सबका विकास’बरोबरच ‘सबका विश्वास’ ही नवी घोषणा दिली आहे आणि आगामी पाच वर्षासाठीची आपली दिशा स्पष्ट केली आहे.

नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नेते, खासदार यांच्यासमोर, तसेच वाराणसी येथे आपल्या कार्यकर्त्यांसमोर जे विचार मांडले, त्या विचार आणि भाषणांची पारायणे राहुल गांधी यांनी केली, तरी त्यांना त्यांचा पक्ष पुढे नेण्यासाठी उपयुक्त ठरेल. यासाठी मनाचा मोठेपणा आवश्यक आहे. केवळ, ‘हम नफरतसे नहीं, प्यारसे जीतेंगे!’ असे हवेत बोलून उपयोगी नाही, तर ‘आधी केले आणि मग सांगितले’ किंवा ‘करून दाखविले’ हे प्रत्यक्षात आणणे महत्त्वाचे आहे. अनुभव हाच माणसाचा गुरू आहे. रणछोडदास बनण्याऐवजी समोर आलेल्या आव्हानांचा ‘सामना’ करण्यातच खरी शान आणि मर्दुमकी आहे. सूज्ञ असतील तर अधिक सांगण्याची गरज आहे असे वाटत नाही. मोदी सरकार-दोनला आणि केंद्रातील महाराष्ट्रातल्या सर्वच मंत्र्यांना मनःपूर्वक शुभेच्छा! जय सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास!

-योगेश त्रिवेदी, मंत्रालय प्रहर

Check Also

जाहीर धुव्वा

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शुक्रवारी संपले. या संपूर्ण अधिवेशनाच्या काळात विरोधी पक्षाचे नेते पूर्णत: निष्प्रभ झालेले …

Leave a Reply