अलिबाग : प्रतिनिधी
जिल्ह्यातील शिक्षकांच्या बदल्यांसाठी शुक्रवारी (दि. 14)जिल्हा परिषदेच्या अलिबाग येथील मुख्यालयात समुपदेशन प्रक्रिया पार पडली. या वेळी जिल्ह्यातील विविध भागातून 250 शिक्षक दाखल झाले होते, मात्र समुपदेशन प्रक्रिया सुरू झाल्यानंतर काही वेळातच पनवेल, उरण, अलिबाग, कर्जत, खालापूर या तालुक्यांतील बदल्यांची प्रक्रिया पूर्ण झाल्याचे शिक्षकांना सांगण्यात आले. त्यामुळे बदली प्रक्रियेदरम्यान जिल्हा परिषदेत दिवसभर गोंधळाचे वातावरण होते. शिक्षकांत एकूणच समुपदेशन प्रक्रियेबाबत नाराजीचा सूर होता.
जिल्ह्यातील शिक्षकांच्या बदल्यासाठी शुक्रवारी शिवतिर्थावर समुपदेशन प्रक्रिया पार पडली. जिल्ह्याच्या विविध भागातून आलेल्या शिक्षकांनी यावेळी मोठी गर्दी केली होती, मात्र ही प्रक्रिया सुरू झाल्यानंतर काही वेळातच पनवेल, उरण, कर्जत, खालापूर, अलिबाग तालुक्यांमधील बदली प्रक्रिया पूर्ण झाल्याचे जाहीर करण्यात आले. त्यामुळे शिक्षकांचा भ्रमनिरास झाला. त्यातच समतोल राखण्यासाठी या तालुक्यांतील काही जागा ब्लॉक करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे अजूनच गोंधळ उडाला. शिक्षकांकडून या तालुक्यांतील किती पदे रिक्त होती, ती कशी भरली, याची विचारणा केली जात होती, मात्र प्रशासनाकडून कुठलीच माहिती दिली जात नसल्याने समुपदेशन प्रक्रियेबाबत नाराजी होती.
सुरुवातीला महिला शिक्षकांना समूहाने बोलाविले जात होते. पनवेल, उरण, कर्जत, खालापूर, अलिबाग वगळून अन्य तालुक्यांतील रिक्त जागांची माहिती देऊन शाळा निवडण्याची सक्ती केली होती. त्यामुळे हताश होऊन शिक्षक बाहेर पडत होते. या प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याचा सूर शिक्षकांनी आळवला. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. शेवटी व्हिडीओ चित्रिकरणात ही प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.