Breaking News

शिष्य व्हा, गुरू ठायी ठायी आहेत…

गुरू कोणाला म्हणावं, याची व्याख्या करणं काही फार कठीण नाही. आपल्याला जो जो काही शिकवतो, तो तो आपला गुरू. या अर्थाने गुरू यत्र तत्र सर्वत्र भरून राहिलेला आहे. गुरूचा धर्मच त्याच्याही कळत वा नकळत शिकवणं हा असतो. प्रश्न आपण त्याच्याकडून काय आणि किती शिकतो हा आहे. आई-वडील, शिक्षक, पत्नी व आणखी काही जवळचे मित्र-परिचित हे आपले प्रत्यक्ष गुरू, पण अप्रत्यक्ष, अपरिचित गुरू तर अगणित असतात. ते देतच असतात, आपण किती घेतो आणि आपल्या वाट्याला आलेला शिष्यधर्म कसा निभावतो याचा विचार गुरुपौर्णिमेच्या दिवशी करणं गरजेचं ठरतं.

आमच्या मुंबईसारख्या शहरात रोज सकाळी कामासाठी बाहेर पडल्यापासून शिकायची सुरुवात होते. नेहमीच्या बसचा कंडक्टर, बसमधील प्रवासी, रिक्षावाला, लोकल प्रवासातील सहप्रवासी यात प्रथम वर्गातले वेगळे आणि द्वितीय वर्गातले वेगळे, नाक्या नाक्यावर लागलेले ’काविळ’ झालेले तथाकथित समाजसेवक, नेते यांचे बॅनर्स, रस्त्याने चालताना दिसणारी अगणित माणसं हे सारे सारे मला कसं वागावं आणि कसं वागू नये याचं अप्रत्यक्ष शिक्षण देत असतात. त्यांच्याकडून मी बरंच काही शिकत असतो आणि स्वत:त ते मला देत असलेल्या अप्रत्यक्ष शिकवणीनुसार माझ्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करत असतो. तरीही बरीच सुधारणा अद्याप व्हायची बाकी आहे, याचा साक्षात्कार पुन्हा हेच चक्र दुसर्‍या दिवशी फिरताना होतो. साक्षात्कार आणि गुरूचा संबंध मला असा रोज नव्याने अनुभवायला मिळतो आणि मग मी दररोज या गुरूंच्या नव्याने प्रेमात पडत जातो.

अशाच एका रिक्षावाल्याने आपलं उदरभरण करणार्‍या साधनाकडे म्हणजे एखादा हातगाडीचा ठेला असो वा पानपट्टीची टपरी असो वा एखादं कॉर्पोरेट ऑफिस असो व अगदी हमाली असो, कसं पाहावं हे शिकवलं. त्याने त्याच्या रिक्षाला चक्क ‘एटीएम’ असं नाव दिलं होतं. जगातल्या सर्व ग्रंथांचा कीस पाडूनही रिक्षासाठी इतकं समर्पक नाव सुचलं नसतं, जे त्या सामान्य माणसाला सुचलं होतं. प्रेम असलं की असं छान छान सुचतं. आपले पोट भरणार्‍या साधनाकडे प्रेमाने पाहावं हे त्या

जेमतेम शिकलेल्या उत्तर प्रदेशी रिक्षावाल्याने मला शिकवलं. एका टॅक्सीवाल्याने गाडीचा हॉर्न हा जनावरांना मागून येणार्‍या गाडीपासून सावध करण्यासाठी असतो, माणसांसाठी नसतो हे शिकवलं; वर ‘आजकल तो मन्सा न होने पर भी हारन बजाना पडता है साहब, क्या करे, आदमी जानवरसे भी बदतर हो गया है’ असं त्याचं अनुभवसिद्ध ज्ञानही साध्या सोप्या शब्दांत दिलं. राजकारणी-भ्रष्ट अधिकारी समाजात कसं वागू नये याची शिकवण तर सकाळ-संध्याकाळ देत असतात,

तेही गुरूच!!

असं रोज काही ना काही आपल्याला शिकवून मला माझ्या शिष्यधर्माची सातत्याने याद दिलवणारे सर्वच मला गुरुस्थानी वाटतात. ‘मला समजते ते सर्व काही नाही’ हे माझं आवडतं वाक्य अशाच गुरूंची मला मिळालेली मोलाची शिकवण आहे. हे गुरू मला सातत्याने जमिनीवर राहाण्यास मदत करत असतात.

दररोज भेटणार्‍या या सर्व गुरूंसारखाच पुस्तकं हा माझा महत्त्वाचा गुरू. सदा सर्वकाळ माझी संगत करणारा. लोक मुद्दाम टाईम अ‍ॅडजस्ट करून, आजूबाजूला जाहिरात करत ‘सत्संग’ करायला जातात. अलीकडे तर सत्संग हा स्टेटस सिंबॉल झालाय हे पेपरात येणार्‍या जाहिरातींवरून समजतं, पण पुस्तकाचा सत्संग करायला कुठंही जावं लागत नाही. तेच बिचारं माझ्या झोळीत (मी झोळीच वापरतो, म्हणून मी झोळी म्हणालो) निवांत बसून माझा संग करत सोबत प्रवास करत असतं. सोबत एखादं पुस्तक आहे ही भावनाच किती आश्वासक असते, हे ज्याने अनुभवलंय त्यांनाच कळेल. सतत सोबत करणारा, अबोल मार्गदर्शन करणारा पुस्तक हा एकमेव गुरू. कोणतीही बंधनं नाहीत की बंध नाहीत, व्रत नाही की सोहळे नाहीत, की काहीच अवजड प्रथा-परंपरा नाहीत.

आपण कल्पना करू शकणार नाही एवढं सामर्थ्य या गुरूत आहे. मी माझ्या गुरूच्या या सामर्थ्याचा मन:पूर्वक अनुभव घेतलाय आणि दररोज घेतो. तहान-भूक-संसार-वंचना-विवंचना-भवताल या सार्‍या सार्‍याचा विसर पाडून क्षणात समाधी अवस्थेत नेणारा हा विलक्षण गुरू आहे. मेडिटेशनचा उपयोग स्वतःला विसरून कुठेतरी स्वतःशी एकरूप होणं हा असतो, हे मला ऐकून माहीत आहे. ही अवस्था समाधी लागण्याच्या जवळपास असते अशी माझी समजूत आहे आणि ती समजूत जर खरी असेल, तर मी खात्रीने सांगू शकतो की, पुस्तक वाचताना माझीही अगदी गाढ समाधी लागते. मी ध्यान, योग, अध्यात्म यांच्या वाटेला कधी गेलो नाही, पण त्यातून जी अनुभूती ते करणार्‍यांना मिळत असेल, त्यापेक्षा मला पुस्तकातून मिळणारी अनुभूती त्यापेक्षा कणभरही कमी नाही. पुन्हा या गुरूशी रममाण होण्यासाठी कोणतीही विशिष्ट जागा, उदबत्तीचा सुगंधी धूर, मंद प्रकाशयोजना, गूढ गंभीर स्वरातले मंत्रोच्चार किंवा आणखी काही इत्यादी कशाचीही गरज भासत नाही. पुस्तक गुरूशी एकरूप होऊन, त्या गुरूच्या हृदयीचे माझ्या हृदयी येण्यासाठी गर्दीचा रस्ता, रेल्वेचा फलाट, उडप्याचं हॉटेल किंवा अगदी स्मशानही चालतं. भगवंताशी तादात्म्य पावण्याचा काय अनुभव होऊन गेलेल्या त्या संतांना आला असेल तो असेल, पण या गुरूशी तादात्म्य पावण्याचा माझा अनुभवही त्या संतांच्या त्या दिव्य अनुभवापेक्षा वेगळा नाही. समाधी लागणं मला वाटतं यालाच म्हणत असावेत.

या गुरूचे वैशिष्ट्य म्हणजे याने ‘मी सर्वज्ञानी नाही’ याची जाणीव माझ्यात सतत तेवत ठेवली. एक पुस्तक वाचून मला काहीतरी समजतंय न समजतंय, तोवर दुसरं त्याच विषयावरचं, परंतु वेगळी मांडणी असणारं पुस्तक हातात पडतं आणि ‘आपल्याला काही समजत नाही’ ही जाणीव आणखी तीव्र होते. मला वाटतं की आपल्याला काही समजत नाही किंवा आपल्याला जे जे समजतं असं वाटतं, ते सर्व काही नसतं, ही भावना आपल्यात निर्माण करून, ज्ञानाच्या दिशेने आणखी चार पावलं नेऊन आपली विचारशक्ती विकसित करणारा पुस्तकासारखा अन्य दुसरा गुरू नाही. माझ्यातलं शिष्यत्व सतत जागतं ठेवणारा हा माझा आणखी एक गुरू.

अनुभव हा आणखी एक गुरू. कोणताही गुरू माणसाला शहाणे करतो, असं आपण म्हणतो. अनुभवाच्या बाबतीतही हे आपण म्हणू शकतो. ‘म्हणू शकतो’ हा शब्दप्रयोग करण्यामागे अनुभवाने माणूस शहाणा होतोच असं नाही हा अनुभव आहे. ‘पुढच्यास ठेच, मागचा शहाणा’ ही म्हण म्हणूनच ठीक आहे, अन्यथा प्रत्यक्षात पुढच्यासही ठेच आणि मागच्यासही ठेचच, हा अनुभव आपल्याला वारंवार आला नसता. सध्या तर इथे आपण दुसर्‍याच्या सोडाच, स्वतःला लागलेल्या ठेचेतूनही काही शिकावयास तयार नाहीत हे वारंवार सिद्ध होतंय. इथे गुरू चुकत नाही, तर शिष्य या नात्याने आपण चुकतो. गुरू मोठा असेल तर शिष्यही त्याच तयारीचा लागतो. इथे कस लागतो तो आपल्यातल्या शिष्याचा. सध्याच्या सर्वत्र अविश्वास भरून राहिलेल्या काळात तर गुरूपेक्षा शिष्याची जबाबदारी खूप वाढलेली आहे. मोबाइलवर येणारे परंतु बुद्धीला न पटणारे मेसेजेस, नेत्यांच्या कोलांट उड्या, धार्मिक आणि जातीय उन्माद, आपल्या सर्वांच्यातच निर्माण झालेले पैशांचे अतोनात महत्त्व आणि त्यातून लयाला गेलेली माणुसकी या सर्व गोष्टी आपल्या पूर्वानुभावाच्या कसोटीवर घासून त्याप्रमाणे आपलं वर्तन करायची आपण शिष्य म्हणून आपली जबाबदारी आहे. खर्‍या-खोट्याची शहानिशा कशी करावी हे अनुभव शिकवतच असतो, आपण शिकत नाही याची खंत आहे.

येत्या मंगळवारी म्हणजे 16 जुलै रोजी गुरुपौर्णिमा आहे. या दिवशी गुरूचं महात्म्य सांगणारे, गुरूकडून काहीतरी शिकलो म्हणून गुरूचे उपकार स्मरणार्‍या हजोरो मेसेजेसचा धुवाँधार पाऊस पडणार, पण गुरूने दाखवलेल्या मार्गावर त्यापैकी किती जण चालताहेत याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला, तर पदरी निराशाच पडेल याविषयी मला तरी शंका नाही. आपण आजवरच्या आयुष्यात जे जे काही शिकलो, ज्यांनी ज्यांनी आपल्याला काही चांगलं शिकवलं त्या शिकवणुकीप्रमाणे वागण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणं हीच खरी गुरुदक्षिणा असेल. असं केलं तरच त्या गुरुपौर्णिमेला अर्थ.

गुरुपौर्णिमा हा केवळ शुभेच्छा (ह्या का देतात हे मला अद्याप समजलेलं नाही. एकाने तर गेल्या वर्षी सर्वपित्री अमावास्येच्याही शुभेच्छा दिल्या होत्या.) देण्याचा दिवस नाही, तर आपल्यापैकी प्रत्येक शिष्याने अंतर्मुख होऊन आपण ज्या ज्या गुरूकडून जे जे काही शिकलो त्याप्रमाणे आपण स्वत: वागत आहोत का याचा विचार करण्याचा, आपल्यातील शिष्यत्व सतत जागतं आहे का हे तपासण्याचा दिवस आहे, असं मी समजतो.

-नितीन साळुंखे (मो. क्र. 9321811091)

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply