Breaking News

पंतप्रधान मोदींची ‘मन की बात’मधून शहीद जवानांना श्रद्धांजली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 24) ‘मन की बात’मधून देशवासीयांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी नॅशनल वॉर मेमोरियल स्मारकाची माहिती दिली. या राष्ट्रीय सैनिक स्मारकाचे 25 फेब्रुवारी रोजी लोकार्पण होणार आहे. देशाच्या लढवय्या सैनिकांच्या त्याग आणि बलिदानाचा सन्मान करण्याचा हा छोटासा प्रयत्न असल्याचे मोदी म्हणाले, तसेच त्यांनी पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. भारतीय सैन्याने नेहमीच कमालीचे धाडस दाखवले आहे. एकीकडे संयम आणि धैर्य बाळगताना दुसरीकडे दहशतवादी आणि शत्रू राष्ट्रांना सैन्याने जशास तसे उत्तर दिले आहे. गेल्या 10 दिवसांपूर्वी भारतमातेने अनेक जवान गमावले आहेत. देशभरातून या घटनेचा तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे देशात सपोर्ट फॅमिली ऑफ शहीद जवान अशी लाट आल्याचे मोदींनी सांगितले. या हल्ल्यानंतर शहीद जवानांच्या कुटुबीयांनी दाखवलेलं धैर्य आणि देशभक्ती देशासाठी प्रेरणादायी ठरली आहे. शहीद कुटुंबीयांच्या या धैर्यामुळे देशातील नागरिकांचा जोश अधिकच वाढल्याचेही मोदींनी म्हटले. मुस्लीम देशांची ताकदवान संघटना असलेल्या ओआयसीने (जखउ) आपल्या 46व्या सत्रामध्ये सहभागी होण्यासाठी भारताला आमंत्रित केलं आहे. पुलवामा हल्ल्यानंतर जगातील बहुतांश देश भारताच्या पाठीशी असून भारताला जागतिक स्तरावर मोठे यश मिळाल्याचे मोदींनी म्हटले. देशातील जवानांच्या धाडसाचे आणि शौर्याचे नेहमीच कौतुक होते, मात्र आजपर्यंत या शहीद जवानांचे एकही स्मारक नसल्याची खंत मोदींनी बोलून दाखवली, तर दिल्ली गेटजवळ उभारण्यात आलेल्या राष्ट्रीय सैनिक स्मारकाचे लोकार्पण 25 फेब्रुवारी रोजी करण्यात येईल. हे स्मारक शहिदांच्या बलिदानाचे प्रतिक असेल, असेही मोदींनी सांगितले. राष्ट्रीय सैनिक स्मारकाची संकल्पना ही, अमर चक्र, वीरता चक्र, त्याग चक्र, रक्षक चक्र या चार वीर चक्रांवर आधारित असल्याचेही मोदींनी सांगितले. दरम्यान, देशात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. देशातील नागरिकांसोबतच मीही या निवडणुकांमध्ये सक्रीय सहभागी असणार आहे. या निवडणुकीत मी उमेदवार असणार आहे. त्यामुळे यानंतरची ‘मन की बात’ मे महिन्यातील शेवटच्या रविवारी होईल, असेही मोदींनी सांगितले.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply