नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
आयएनएक्स भ्रष्टाचार प्रकरणात सीबीआयने पी. चिदंबरम यांना अटक केली आहे. या अटकेमागे मोदी सरकार असल्याचा आरोप काँग्रेसने पत्रकार परिषद घेऊन केला होता. काँग्रेसच्या आरोपांवर केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. चिदंबरम यांच्यावरील कारवाई कायद्याप्रमाणे होत आहे. त्यात केंद्र सरकार आणि भाजपची कोणतीही भूमिका नाही, असे केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी स्पष्ट केले आहे.
चिदंबरम यांच्या अटकेवरून राजधानी दिल्लीत बराच गोंधळ निर्माण झाला आहे. मागील दोन दिवसांपासून लोकशाहीची हत्या होत असल्याचे देश माध्यमांवरून बघत आहे. भाजप सरकारने ईडी आणि सीबीआय या तपास संस्थांचा वापर सूड उगवण्यासाठी केला आहे. या आकसातूनच माजी केंद्रीय मंत्री चिदंबरम यांना अटक केली आहे. बेरोजगारी, रुपयाची होत असलेली घसगुंडी इतके सगळे प्रश्न सध्या देशासमोर उभे आहेत. त्यावरून लक्ष हटवण्यासाठीच ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे. मोदी सरकार कोणत्या थराला जाणार हे आम्ही बघणार आहोत, असे काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले होते.
दरम्यान, काँग्रेसकडून करण्यात आलेले सर्व बिनबुडाचे आरोप केंद्र सरकारने फेटाळले आहेत. केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी काँग्रेसच्या आरोपांवर बोलताना म्हणाले की, कायदा त्याचे काम करीत आहे. न्यायालयाने कायद्याप्रमाणे निर्णय घेतला आहे. भाजप किंवा केंद्र सरकारचा कोणत्याही प्रकारचा त्यात सहभाग नाही. ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांना कुठे ठेवायचे ते सरकार नाही तर न्यायालय ठरवेल, असेही रेड्डी यांनी ठणकावून सांगितले.भाजपचे नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनीही काँग्रेसच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भ्रष्टाचाराला क्रांतीचे रूप देण्याचा प्रयत्न काँग्रेस नेतृत्वाकडून केला जात आहे. सध्या काँग्रेस नकारात्मक मानसिकतेत काम करीत आहे. भ्रष्टाचाराला क्रांतीचे रूप देण्याचे काम पहिल्यांदाच होत आहे, अशी टीकाही नक्वी यांनी केली.
RamPrahar – The Panvel Daily Paper