खालापूर, खोपोली : प्रतिनिधी
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ब्रेक निकामी होऊन एक खासगी बस अमृतांजन पुलाच्या कठड्याला धडकल्याची घटना सोमवारी (दि. 9) पहाटे घडली. या अपघातात 12 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी खासगी बस खंडाळा घाट उतरत असताना ब्रेक निकामी झाल्याने अनियंत्रित होऊन अमृतांजन पुलाच्या कठड्यावर आदळली. या अपघातात प्रवाशांच्या डोक्याला व हातापायाला गंभीर दुखापत झाली असून, 23 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, देवदूत यंत्रणा घटनास्थळी पोहाचली. गंभीर जखमींना रुग्णवाहिकेतून लोकमान्य रुग्णालयात नेण्यात आले, तर किरकोळ जखमींना पर्यायी बसने मुंबईकडे रवाना करण्यात आले.
दरम्यान, अमृतांजन पुलाखाली रस्ता अरूंद असल्याने अपघातानंतर एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी झाली होती. मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक जवळपास एक तास खोळंबल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वाहतूक पोलिसांनी अपघातग्रस्त बस महामार्गावरून बाजूला केल्यानंतर मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्ववत झाली.
RamPrahar – The Panvel Daily Paper