धनबाद (झारखंड) : वृत्तसंस्था
काँग्रेस पक्षाने नेहमीच शरणार्थींचा वापर केला आहे आणि आता नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून ते ईशान्य भागात आग लावत आहेत, असा थेट आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडमधील निवडणूक सभेत बोलताना केला. काँग्रेस लोकांमध्ये संभ्रम पसरवत असून, मी ईशान्येकडील लोकांना खात्री देतो की त्यांनी कोणाकडूनही फसण्याची गरज नाही. ईशान्य भारतीय समाजाची संस्कृती, भाषा, मूल्ये, सन्मान अधिक समृद्ध करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाहीही पंतप्रधानांनी या वेळी दिली.
नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी काँग्रेसवर हल्लाबोल करताना म्हणाले की, काँग्रेसचे धोरण नेहमीच लुटा आणि लटकवा असे राहिले आहे. बाहेरून येणार्या प्रत्येक निर्वासिताला आम्ही नागरिकत्व देऊ, असे काँग्रेसच्या नेत्यांनी निवडणुकीपूर्वी आश्वासन दिले, पण काय झाले? आता ते पुन्हा मागे हटले. असे असले तरी शोषित लोकांना हक्क मिळायला हवेत की नाही? शेजारच्या देशांमध्ये अल्पसंख्याकांचा छळ झाला. अनेक शतकांपासून लक्षावधी अल्पसंख्याकांचे शोषण होत आहे. त्यांना मानवी दृष्टिकोनातून आम्ही नागरिकत्व द्यायला निघालो असताना यालाही काँग्रेस विरोध करीत आहे.