चेन्नई ः वत्तसंस्था
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताने 50 षटकांत 9 बाद 289 धावा केल्या. विंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत या दोघांनी भारताच्या डावाला आकार दिला.
चेन्नईच्या एम.ए.चिदंबरम स्टेडियमवर रविवारी (दि. 15) खेळल्या गेलेल्या सामन्यात वेस्ट इंडिजचा कर्णधार किएरॉन पोलार्ड याने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले. भारताने या सामन्यात शिवम दुबेला संघात स्थान दिले. दुबेचे हे वनडे क्रिकेटमधील पदार्पण ठरले. भारताच्या डावाची सुरुवात रोहित शर्मा आणि के.एल.राहुल यांनी केली. सलामीच्या या जोडीला मोठी भागिदारी करता आली नाही. राहुल 6 धावा करून बाद झाला. त्यानंतर कर्णधार विराट आणि रोहित यांची जोडी मोठी धावसंख्या उभी करले असे वाटले होते, पण टी-20 मालिकेत शानदार कामगिरी करणार्या विराटने निराशा केली. तो 4 धावा करून बाद झाला. विराट बाद झाला तेव्हा भारताची अवस्था 2 बाद 25 अशी होती. विराटच्या जागी आलेल्या श्रेयस अय्यरने रोहितसोबत धावफलक हलता ठेवला. ही जोडी संघाला शंभरच्या पुढे घेऊन जाईल असे वाटत होते तेव्हाच पोलार्डने रोहित शर्माला 36 धावांवर बाद केले.
भारतीय संघ अडचणीत आलेला असताना मैदानात अय्यर आणि ऋषभ पंत ही जोडी होती. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 114 धावांची शतकी भागिदारी केली. अय्यर 70 धावा करून बाद झाला. त्याने 5 चौकार आणि एक षटकार मारला. त्यापाठोपाठ पंतदेखील 71 धावा करून बाद झाला. अखेरच्या 10 षटकांत केदार जाधव (40), रवींद्र जडेजा (21) यांनी 77 धावा संघासाठी जोडल्या. वेस्ट इंडिजकडून अल्झारी जोसेफ, शेल्डन कॉट्रिएल यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले, तर कीमो पॉल आणि पोलार्ड यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.