नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील विविध विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भाष्य केले आहे. विद्यार्थी चळवळींमध्ये शिरलेल्या जिहादी, नक्षलवादी आणि फुटीरतावाद्यांपासून जनतेनं सावध रहावं असं त्यांनी म्हटलं आहे.
सितारामन म्हणाल्या, या विकेंडच्या काळात दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात घडलेल्या घटनेबाबत मला माहिती नव्हती. मात्र, विद्यार्थी चळवळींमध्ये शिरलेल्या जिहादी, नक्षलवादी आणि फुटीरतावाद्यांपासून जनतेनं सावध रहायला हवं. दरम्यान, काँग्रेसवर निशाणा साधताना त्या म्हणाल्या, विद्यार्थी कार्यकर्ते आता राजकारणी बनले आहेत. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरुन काँग्रेसने जनतेच्या भावना भडकवण्याचे काम केले आहे. यातून विरोधकांची हतबलता दिसून येते. आंदोलने ही विद्यापीठांसाठी नवी नाहीत. मात्र, आदर्शवाद हा विद्यार्थ्यांना त्यांच्या वयानुसार मार्गदर्शन करीत असतो.
सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात दिल्लीमधील जामिया मिलिया इस्लामिक विद्यापीठात पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये उडालेल्या धुमश्चक्रीनंतर हिंसाचार भडकला असून देशभरातील अनेक विद्यापीठांमधील विद्यार्थी आंदोलन करत रस्त्यावर उतरले आहेत. या विद्यापीठातील विद्यार्थ्यांना लायब्ररीमध्ये घुसून पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप विद्यापीठाच्या कुलगुरुंनी केला आहे.