चंद्रकांत पाटील यांचे भाकीत
पुणे : प्रतिनिधी
राज्यात भीषण परिस्थिती आहे. कोण काय बोलतोय काहीच कळत नाही. त्यामुळे राज्यातील महाआघाडीचे सरकार पाडण्यासाठी भाजप कोणतेही प्रयत्न करणार नाही. ते आपोआप पडेल, असे भाकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वर्तवले आहे.
इंदिरा गांधी व करीम लाला यांच्या भेटीबद्दल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावरून राज्यात सध्या राजकारण तापले आहे. पाटील यांनी याबाबत शिवसेनेवर पलटवार केला आहे. पंतप्रधान इंदिरा गांधी आणि करीम लाला यांच्या भेटीबद्दलचे वक्तव्य अशोभनीय आणि निंदनीय आहे. त्यात तथ्य असल्यास चौकशी व्हायला हवी आणि तसे नसल्यास काँग्रेसने गांभीर्याने विचार करावा, असे पाटील यांनी म्हटले आहे.
मोदी व शिवाजी महाराज यांच्या तुलनेच्या वादावरूनही पाटील यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. 2012मध्ये संजय राऊत यांनी स्वत: बाळासाहेब ठाकरे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना केली होती. कोणत्याही पक्षाने महापुरुष आणि राजकीय व्यक्तींची तुलना करूच नये, असेही ते म्हणाले.