Breaking News

‘शिवसेना ही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दबावाखाली’

पुणे : प्रतिनिधी

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) मोहिमेबाबत शिवसेनेची भूमिका अत्यंत कलुषित झाली आहे. बांगलादेशी व पाकिस्तानी घुसखोरांना हाकलून लावणार्‍या ‘सीएए’-‘एनआरसी’चे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समर्थन केले पाहिजे, मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावामुळे ते भूमिका घेत नाहीत, अशी टीका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी रविवारी (दि. 2) येथे केली.

पुण्यातील शनिवार पेठेत आरपीआयच्या नव्या मध्यवर्ती कार्यालयाचे आणि कायदेशीर मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन मंत्री आठवले यांच्या हस्ते झाले. या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते. बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका योग्य असून, ते सीएए, एनआरसीच्या पाठिंब्यासाठीच अप्रत्यक्षपणे मोर्चा काढत आहेत, अशा शब्दांत त्यांनी राज ठाकरेंचे अभिनंदन केले.

‘सीएए’, ‘एनआरसी’बाबत देशातील मुस्लिमांना भडकविण्याचा प्रयत्न केला जात आहे, मात्र हा कायदा नागरिकत्व देणारा असून हिरावणारा नाही, असेही आठवलेंनी नमूद केले.

दरम्यान, काही लोकांना वाचविण्यासाठी नव्हे, तर वाचलेल्यांना पकडण्यासाठी एल्गार परिषद प्रकरण राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपविले आहे, असे म्हणत आठवले यांनी एल्गार प्रकरण एनआयकडे सोपविण्याच्या केंद्राच्या निर्णयाचे स्वागत केले.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply