Breaking News

ग्रामपंचायत कर्मचार्यांची उद्या जिल्हा परिषदेवर धडक

प्रलंबित मागण्यांची तड लावण्यासाठी आंदोलनाचे हत्यार

अलिबाग : प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचारी आपल्या प्रलंबित मागण्यांची तड लावण्यासाठी गुरुवारी (दि. 6) रायगड जिल्हा परिषदेच्या अलिबाग येथील मुख्यालयावर मोर्चा काढणार आहेत. आयटकशी संलग्न रायगड जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेने या मोर्चाचे आयोजन केले आहे. ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना ऑनलाइन वेतन सुरू झाले आहे, मात्र आजही अनेक कर्मचार्‍यांचे एप्रिल 2018 पासूनचे 6 महिने, 8 महिने, 12 महिने असे वेतन थकीत आहे. यासंदर्भात ग्रामपंचायती, पंचायत समित्या किंवा जिल्हा परिषदेकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याने कर्मचारी आपल्या हक्काच्या वेतनापासून वंचित आहेत. याला जबाबदार असणार्‍या संबंधितांवर कारवाई करावी व न्याय मिळावा. ज्या ग्रामपंचायती किमान वेतनाच्या फरकाची रक्कम देत नाहीत, त्यांच्यावर कारवाई करावी, अशी संघटनेची मागणी आहे. सेवाज्येष्ठता यादी वेळेवर प्रसिध्द होत नाही, ग्रामपंचायत कर्मचार्‍यांच्या 10 टक्के जागा भरण्याचे आदेश आहेत, परंतु त्या भरल्या जात नाहीत, ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना कामावरून कमी करण्याचे प्रकार घडत असतात, त्याची योग्य ती चौकशी करण्याचे आदेश वेळेत द्यावेत, जिल्हा पातळीवर तक्रारी करूनही त्यांचे निराकरण होत नाही, अशा तक्रारी दोन वर्षे प्रलंबित राहत असल्याने कर्मचार्‍यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ येत आहे, या सर्व प्रश्नांची तड लावण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचार्‍यांनी आता आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

Check Also

नितीन पाटील यांच्या रूपाने पनवेलला मिळणार पहिला आगरी समाजाचा महापौर

उपमहापौरपदासाठी प्रमिला पाटील यांचा अर्ज दाखल पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाकरिता होणार्‍या …

Leave a Reply