Saturday , March 25 2023
Breaking News

शाळकरी मुले सोशल साईट्सच्या विळख्यात

नवी मुंबई : प्रतिनिधी

सोशल मीडियातील विविध माध्यमे मानवाला वास्तविक जगापासून दूर घेऊन जात आहेत. याच्या वापराने लोक भ्रामक विश्वात राहण्यावर विश्वास ठेवत आहेत, परंतु या समस्येवर योग्य निदान शोधण्याकडे कोणाचे लक्ष नाही. युवकांसोबत शाळकरी मुलेसुद्धा या भ्रामक जगात गुंग होत आहेत. समाजाच्या दृष्टीने ही चांगली लक्षणे नाहीत, असे निरामय गाईडन्स क्लीनिकच्या संचालिका व बालविकास तज्ञ  डॉ. अंजना थडानी यांनी म्हटले आहे. दहावीच्या परीक्षा सुरू आहेत. थोड्यात दिवसांत प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या परीक्षा सुरू होणार आहेत. मार्च महिना हा तसा वार्षिक परीक्षांचा व या काळात पालकांना तारेवरची कसरत करावी लागते. आता यात भर पडली आहे ती सोशल मीडियाची. दहा वर्षांपूर्वी मोबाईल इंटरनेट सोशल मीडिया याचा फारसा वावर नसल्यामुळे पालक व विद्यार्थी यांचा अभ्यासाविषयक थेट संवाद होत असे, परंतु जसा जसा सोशल मीडियाचा वापर अती प्रमाणात होऊ लागला तेव्हा कुठेतरी हा संवाद संपल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. नेटवरून अभ्यास, रिपोर्ट कार्ड, अभ्यासात काही अडलं तर नेट आहेतच नाही; तर व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकवर 24 तास उपलब्ध असलेले ग्रुप. सगळे काही नेटवर उपलब्ध, परंतु या नेटचा वापर करता करता अनेक विद्यार्थी सोशल मीडियाच्या कधी आहारी जातात ते कळत नाही व याचा विपरीत परिणाम त्यांच्या अभ्यासावर होत असल्याचे निरीक्षण मुंबई येथील निरायम गाईडन्स क्लीनिकतर्फे व्यक्त करण्यात आले आहे. शालेय मुलांचा सर्वांगीण विकास व  विलंब, शारीरिक अपंगता, डिस्लेक्सिया, स्वमग्नता, सेरेब्रल पाल्सी,  मुलांच्या शैक्षणिक समस्या दूर करण्यासाठी  निरामय गाईडन्स क्लीनिक मुंबई, नवी मुंबई व लखनौ येथे कार्यरत आहे. याविषयी अधिक माहिती देताना डॉ. अंजना थडानी सांगतात, सोशल नेटवर्किंगमुळे युवकांबरोबरच लहान मुलेही आत्मकेंद्रित होत असून, स्वत:ची स्तुती ऐकणे त्यांना आवडू लागलेले आहे. माझ्या पोस्टला अथवा लुकला (पेहराव, हेअर स्टाईल) माझ्या मताला (ओपिनियन) सोशल मीडिया व्हॅल्यू किती आहे हे बघण्याची चढाओढ मुलांमध्ये लागली आहे; तर पालकांना याविषयी माहिती असूनही त्यावर संवाद साधला जात नाही ही आजची शोकांतिका आहे. म्हणूनच आम्ही परीक्षेच्या काळात मुलांना व पालकांना सोशल मीडियापासून दूर राहण्याचा सल्ला देत आहोत. चीन, तैवान आणि दक्षिण कोरिया या देशांनी अलिकडेच इंटरनेटच्या व्यसनाला एक मानसिक आजार म्हणून मान्यता दिली आहे. सोशल नेटवर्किंगचे व्यसन सोडणे अतिकठीण असल्याचा दावा शिकागो विद्यापीठातील संशोधकांनी केला असून, भारतामध्ये याविषयी अधिक चर्चा होणे गरजेचे आहे.

  • सर्वेक्षणातून समोर आलेले मुद्दे

मुंबईतले 70.8% विद्यार्थी कुठेही असले तरी 15 ते 180 मिनिटे सोशल मीडियावर आपला वेळ घालवतात. 48.2% मुलं शाळेच्या अभ्यासासाठी सोशल मीडियाचा वापर करतात. 47.7% मुलं अभ्यासासाठी व्हिडिओ चॅट करतात. त्यातले 22.2% मुलं व्हिडिओ चॅटिंगद्वारे नवीन छंद शिकतात. 17.7% मुलं शाळेतल्या चाचणी परीक्षांची तयारी आणि 20.8 % मुलं शाळेनं दिलेल्या असाइनमेण्ट्सा पूर्ण करण्यासाठी व्हिडिओ चॅटिंगचा आधार घेतात, अशी माहिती टाटा कन्सलटन्सी सव्हिसेस अर्थात टीसीएसने देशभरातल्या 15 शहरांतील माध्यमिक शाळेत जाणार्‍या 13,00 शाळकरी मुलांच्या सर्वेक्षणातून समोर आणली आहे. आपल्याच आई बाबांशी, आजी-आजोबांशी व्हिडिओ चॅटिंगद्वारे संपर्क साधून बोलणार्‍या मुलांचे प्रमाण थोडेथोडके नसून, 55.6 टक्के आहे. शाळेच्या अभ्यासाबाबत, असाइनमेण्टसबाबत एकमेकांशी चर्चा करता यावी यासाठी मुले व्हॉटसअ‍ॅपवर ग्रुप करता आहेत, अशी माहिती या सर्वेक्षणात आढळून आली आहे.

Check Also

राहुल गांधी माफी मागा!.. भाजपचे पनवेलमध्ये आंदोलन; घोषणाबाजी करून निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त काँग्रेस नेते राहुल गांधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या बेताल …

Leave a Reply