कर्जत : प्रतिनिधी
तालुक्यातील कळंब येथील देना बँकेचे एटीम केंद्र मागील दोन तीन महिन्यांपासून बंद होते. त्यामुळे या भागातील एटीम कार्ड धारकांची, ग्राहकांची मोठी गैरसोय झाली होती. अखेर ग्राहकांच्या तक्रारीची दखल घेत उशिर का होईना, हे एटीएम केंद्र सुरु करण्यात आले आहे.
कर्जत शहरापासून दूर असलेल्या कळंब गावात एकमेव असलेली देना बँक मागील अनेक वर्षांपासून ग्राहकांना अखंडितपणे सेवा देत आहे. या बँकेने काही वर्षांपासून आपले एटीम केंद्र सुरू केले आहे. या भागातील 13 किलोमीटर परिसरात हे एकमेव एटीएम केंद्र असल्याने बँक ग्राहकांना चोवीस तास गरजेच्या वेळी उपयोगी पडत होते. मात्र येथील एटीम मशीन वेळोवेळी बंद पडत असल्याने मागील दोन तीन महिन्यापासून ग्राहकांची गैरसोय होत होती. कधी एटीएममध्ये पैसेच नाहीत, कधी नेटवर्क नाही, तर कधी मशीनमध्ये तांत्रिक बिघाड या सारख्या कारणांनी हे एटीएम नेहमीच बंद असायचे. त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी बँक कर्मचार्यांवर कामाचा ताण वाढत होता, ग्राहकांनाही पैशांसाठी बँकेत रांग लावावी लागत होती. ग्राहकांची गैरसोय लक्षात घेऊन, देना बँकेचे शाखा व्यवस्थापक राजीव यादव यांनी येथील एटीएम मशीन सुरू व्हावी, यासाठी वेळोवेळी वरिष्ठ अधिकार्याकडे प्रयत्न केले होते, मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याने बँक ग्राहकांत मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली होती. अखेर बँकेच्या वरिष्ठ अधिकार्यांनी कळंब येथील एटीम मशीन पूर्ववत केल्याने या केंद्राचे बंद असलेले शटर उघडले आहे. एटीम केंद्राची सेवा सुरळीत सुरू झाल्याने ग्राहकांकडूनही समाधान व्यक्त होत आहे.