Breaking News

पूनमची घेतली कांगारूंची फिरकी; भारताचा दणक्यात विजय

सिडनी : वृत्तसंस्था

पूनम यादवच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर भारताने आयसीसी महिला टी-20 वर्ल्ड कपमधील पहिल्याच सामन्यात गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा 17 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करत भारताने ऑस्ट्रेलियाला 133 धावांचे लक्ष्य दिले होते, पण गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला 115 धावांवरच ऑल आऊट केले.

भारताने दिलेल्या 133 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली. शिखा पांडेने बेथ मुनीची विकेट घेत भारताला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर राजेश्वरी गायकवाडने मेग लॅर्निंगची विकेट घेत दुसरा धक्का दिला. त्यानंतर फिरकीपटू पूनम यादवने अलिसा हिलीची विकेट घेत भारताला तिसरे यश मिळवून दिले. 12व्या षटकात पूनमने तिसर्‍या आणि चौथ्या चेंडूवर विकेट घेत ऑस्ट्रेलियाला लागोपाठ दोन धक्के दिले. पूनमला हॅट्ट्रिकची संधी होती, पण पाचव्या चेंडूवर कॅच सुटला.

हॅट्ट्रिक हुकल्यानंतरच्या पुढच्या ओव्हरमध्ये पूनमने जेस जोनासेनला बाद करीत ऑस्ट्रेलियाची सहावी विकेट घेतली. त्यापाठोपाठ शिखाने सदरलँडला बाद करीत भारताला आणखी एक यश मिळवून दिले. अखेरच्या षटकात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 6 चेंडूंत 21 धावांची गरज होती. भारतीय संघाने अखेरच्या दोघा फलंदाजांना धावबाद केले आणि 17 धावांनी विजय मिळवला.भारताकडून पूनमने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. शिखाने 2, तर राजेश्वरीने एक विकेट घेतली. त्याआधी भारताने दीप्ती शर्माच्या नाबाद 49 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला 133 धावांचे आव्हान दिले होते.

Check Also

गिरवलेचे सरपंच प्रताप हातमोडे भाजपमध्ये दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्तगिरवले गावचे सरपंच प्रताप चंद्रकांत हातमोडे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी भारतीय जनता पक्षामध्ये …

Leave a Reply