Breaking News

काँग्रेसशी आघाडी नाही : अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

अकोला : प्रतिनिधी

भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष आणि बहुजन वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसबरोबरची संभाव्य आघाडीची शक्यता मावळली असल्याचे म्हटले आहे. येत्या 15 तारखेला राज्यातील सर्व 48 जागांवरील उमेदवारांच्या नावाची घोषणा करणार असल्याचेही त्यांनी मंगळवारी (दि. 12) प्रसारमाध्यमांशी बोलताना जाहीर केले.

लातूरचे अण्णाराव पाटील, सातार्‍याचे लक्ष्मण माने हे काँग्रेसशी आघाडीसंदर्भात चर्चा करीत होते. 22 जागी आम्ही उमेदवार जाहीर केलेत. काँग्रेस पक्षाला आमच्याकडून प्रस्ताव देण्यात आला, परंतु तो काँग्रेसने स्वीकारला नाही. लोकशाहीचे सामाजिकीकरण झाले पाहिजे. लोकशाहीच्या सामाजिकीकरणाचा एक भाग म्हणून वेगवेगळ्या घटकाला उमेदवारी देणे हे राजकीय पक्षांचे कर्तव्य आहे, असे सांगून

अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले की, ज्या 22 जागी उमेदवार दिले आहेत, ते माघार घेणार नसल्याचे काँग्रेसला सांगितले होते. काँग्रेसने ते उमेदवार स्वीकारावेत किंवा वंचित बहुजन आघाडीऐवजी काँग्रेसने आपला एबी फॉर्म लावावा, अशी ऑफर आम्ही काँग्रेस पक्षाला दिली होती.

काँग्रेस आमचे 22 उमेदवार स्वीकारण्यास तयार नाही. काँग्रेसकडून होकार न आल्याने या चर्चा पुढे जातील, असे वाटत नाही. उर्वरित उमेदवारांचा निर्णय करून 15 तारखेला 48 उमेदवारांची यादी जाहीर करू, असेही अ‍ॅड. आंबेडकरांनी सांगितले.

राजू शेट्टींचा आघाडीला अल्टीमेटम

पुणे : बहुजन वंचित आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या आघाडीत सहभागी होणार नाही, असे सांगत महाराष्ट्रातील 48 जागांवर वंचित आघाडीचे उमेदवार उभे करणार असल्याचे जाहीर केले असताना, पाठोपाठ खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी (दि. 11) पुण्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला अल्टीमेटम दिला. आम्हाला तीन जागा सोडाव्यात; अन्यथा राज्यात 15 ठिकाणी आमची संघटना स्वतंत्रपणे निवडणुका लढण्यास सज्ज आहे, असा इशारा शेट्टी यांनी दिला आहे.

पुण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली या बैठकीनंतर राजू शेट्टी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी शेट्टी म्हणाले की, आघाडीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी तीन जागा सोडाव्यात. यामध्ये हातकंणगले लोकसभा मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आहे. जी जागा आमचीच आहे ती देण्याचा प्रश्नच नाही. बुलडाणा येथील राष्ट्रवादीच्या कोट्यातील जागा; तर वर्धा येथील काँग्रेस कोट्यातील जागाही आमच्यासाठी सोडण्यात यावी.

Check Also

खारघर हिल महापौर मॅरेथॉन प्रोमो रनला उत्तम प्रतिसाद

खारघर ः रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वतीने रविवारी (दि.19) आयोजित करण्यात आलेल्या खारघर हिल महापौर मॅरेथॉन …

Leave a Reply