कर्जत : बातमीदार
तालुक्यातील साळोख तर्फे वरेडी ग्रामपंचायत हद्दीतील माले गावातील शेतकर्याच्या शेतावर असलेला गुरांचा गोठा आणि साठवून ठेवलेला चारा गुरुवारी (दि. 27) सायंकाळी अचानक लागलेल्या आगीमध्ये जळून खाक झाला आहे. त्यामुळे शेतकर्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. माले गावातील शेतकरी हरिचंद्र जानू हिसालगे यांची शेती गावापासून लांब आहे. त्यामुळे त्यांनी शेतावरच अवजारे तसेच गुरे ठेवण्यासाठी गोठा बांधला आहे. मचाण बांधून त्याच्यावर भाताच्या सुक्या मोळ्या म्हणजे पेंढे ठेवले होते. या मोळ्यांना गुरूवारी सायंकाळी आग लागली. त्यावेळी तेथे कोणीही नसल्याने आगीत गोठादेखील पूर्णपणे जळून नष्ट झाला. गोठ्यासोबत किमान दोन हजार पेंढ्याच्या मोळ्या जळून गेल्याने शेतकरी हरिचंद्र हिसालगे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. मात्र जनावरे चारा खायला मोकळी सोडली असल्याने त्यांना कोणत्याही प्रकारची दुखापत झालेली नाही. या आगीबाबत माहिती मिळाल्यानंतर कर्जतचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी कळंब येथील मंडळ अधिकार्यांना तत्काळ पंचनामा करायला पाठवले आहे.