Breaking News

प्रचंड मताधिक्क्याने विजयी होणार

पनवेल : वार्ताहर

नगरपालिकेच्या निवडणुकीसह आमदारकी व खासदारकीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने मला पाडण्यासाठी व प्रामुख्याने अजित पवारांनी अटोकाट प्रयत्न केले, परंतु ते एकदाही यशस्वी झाले नाहीत. ही माझी आठवी निवडणूक असून या

निवडणुकीतसुद्धा मागील मताधिक्क्यापेक्षा जास्त मते घेऊन मी निवडून येईल, असा ठाम विश्वास खासदार श्रीरंग बारणे यांनी बुधवारी (दि.13) खारघर येथे आयोजित पनवेल-उरण-कर्जत-खालापूर मतदारसंघातील पदाधिकारी मेळाव्यात बोलताना व्यक्त केला.

या वेळी संपर्क नेते विनायक दळवी, खा. श्रीरंग बारणे, आमदार व जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर, जिल्हाप्रमुख शिरीष घरत, जिल्हा समन्वयक अनिल चव्हाण, जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील, जिल्हा सल्लागार शिरीष बुटाला, उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, पनवेल विधानसभा संपर्कप्रमुख राजेंद्र यादव, महानगरप्रमुख रामदास शेवाळे, उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, अरुणभाई स्वरूप, महिला आघाडी जिल्हा संघटक रेखाताई ठाकरे, अनघा कानिटकर, उपजिल्हाप्रमुख महेंद्र थोरवे, युवा सेनेचे रूपेश पाटील, अवचित राऊत, पराग मोहिते यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी बोलताना खा. श्रीरंग बारणे यांनी सांगितले की, मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीची काय ताकद आहे हे सर्व जण जाणून आहेत. त्यामुळे मागील वर्षी मी 1 लाख 56 हजार मतांनी विजयी झालो होतो. यंदाच्या निवडणुकीत 2 लाखांपेक्षा जास्त मतांनी विजयी होईल. देशाचे नेतृत्व करणारे नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे, असे आवाहनसुद्धा त्यांनी केले.

तर या वेळी बोलताना संपर्क नेते विनायक दळवी यांनी सांगितले की, युतीची निवडणूक असून सर्वांनी आपापसातील मतभेद विसरून कामाला लागून युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना कोणत्याही परिस्थितीत पुन्हा एकदा लोकसभेत पाठवायचे आहे. त्यांनी केलेले कार्य घराघरात पोहचविण्याचे काम आता सर्व इतर पदाधिकारी व शिवसैनिकांचे आहे. सुरुवात गोड झाली आहे. त्यामुळे शेवटसुद्धा गोड होऊन आपलाच विजय निश्चित असल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार व जिल्हाप्रमुख मनोहर भोईर यांनी सांगितले की, आपल्या उमेदवारामुळे विरोधकांत धडकी भरली आहे. मावळ हा शिवसेनेचा पहिलासुद्धा होता आणि आतासुद्धा शिवसेनेकडेच राहणार असून बारणे प्रचंड मतांनी विजयी होतील यात तिळमात्र शंका नसल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील यांनी, तर आभार जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी मानले.

मी लोकांमध्ये वावरणारा कार्यकर्ता आहे. जनतेचे प्रश्न मी संसदेत मांडले आहेत व त्यांना न्याय मिळवून दिला आहे. त्यामुळेच मला पाच वेळा संसदपटूचा सन्मान मिळाला आहे. माझ्यासमोर आघाडी उभा करत असलेला उमेदवार हा नवखा आहे. त्यांनी आजपर्यंत कोणतीही निवडणूक लढलेली नाही.

-खासदार श्रीरंग बारणे

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply