Breaking News

‘डिजिटल परवान्याने उद्योग, व्यापारात सुलभता आणावी’

अर्थचक्र फिरविण्यासाठी सरकारकडून प्रयत्न आवश्यक

नाशिक : प्रतिनिधी

कोरोनाला घाबरून कायमचे घरात बसता येणार नाही. अर्थ चक्र फिरविण्यासाठी व्यापार व उद्योग सुरू करावेच लागतील. तेव्हा सर्व विचार व समन्वय साधून डिजिटल पद्धतीने सर्व परवाने विनाविलंब देऊन व्यापार व उद्योग क्षेत्रात सुलभता आणावी लागेल, असे मत माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर उद्योजकांच्या समस्यांविषयी मंथन करण्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे घेण्यात येत असलेल्या चर्चासत्रात त्यांनी उद्योजक व्यापार्‍यांना मार्गदर्शन केले. देवेंद्र फडणवीस म्हणाले, एमएसएमई हे विशेष महत्त्वाचे क्षेत्र असून, त्यांची मुख्य समस्या खेळते भांडवलाची सोडविली पाहिजे. त्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडे ठोस पाठपुरावा करण्याचे आश्वासनही त्यांनी उद्योजकांना दिले, तर चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी सद्य परिस्थीतिचा आढावा घेताना लघुत्तम, लघु व मध्यम उद्योग  तसेच व्यापारी व शेतकरी यांना जाणवत असलेल्या अडचणींबाबत तसेच उद्योग सुरू करण्यासाठी सरकारने दिलेल्या नियमावलीकडे लक्ष वेधले. या चर्चासत्रामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही उद्योजकांशी संवाद साधला. दरम्यान, चेंबरचे राज्यभरातील प्रतिनिधी विवेक दालमिया, विनोद कलंत्री, राजू राठी, गिरीधर संगनेरिया, पोपटलाल ओस्तवाल, विजय पुराणिक, आशिष पेडणेकर, रामभाऊ भोगले, मीनल मोहाडीकर, अनिलकुमार लोढा, रवींद्र मानगावे, शुभांगी तिरोडकर, प्रदीप पेशकार, धनंजय बेळे, अजित सुराणा, सुनीता फाल्गुने, सोनल दगडे यांनी सहभाग घेत त्यांचे मत मांडले. शेवटी ललित गांधी यांनी आभार मानले.

Check Also

नवीन पनवेलमधील आगग्रस्त कुटुंबांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून आर्थिक मदत

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून घटनास्थळी पाहणी पनवेल ः रामप्रहर वृत्तनवीन पनवेल सेक्टर 1/एस …

Leave a Reply