नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आज जग कठीण परिस्थितीतून जात आहे. तुमच्यामध्ये येणे माझ्यासाठी एरव्ही सौभाग्य असते, परंतु सद्यस्थितीत त्यास परवानगी नाही. बुद्धांच्या पावलावर पाऊल ठेवून भारत आज सर्वांना मदत करीत आहे. या काळात नफा-तोटा पाहिला जात नाही. भारत जगाच्या पाठीशी उभा आहे. संकटाच्या वेळी सर्वांना मदत करणे हाच प्रत्येकाचा धर्म आहे. सामाजिक कार्य निरंतर सेवेने केले पाहिजे. इतरांवर करुणा असणे महत्त्वाचे असते, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (दि. 7) बुद्ध पौर्णिमेनिमित्त आयोजित प्रार्थना सभेत केले. कोरोनाबाधित आणि महामारीशी लढणार्या कोरोना योद्ध्यांच्या सन्मानासाठी ही सभा आयोजित करण्यात आली होती.
कोरोनाने जगभरात धुमाकूळ घातला असून, अनेक देशांत संक्रमितांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. बुद्ध पौर्णिमेच्या पवित्र दिवशीच आज कोरोना वॉरियर्सचा सन्मान केला जात असल्याचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भगवान बुद्धांनी जगाला सेवेचा संदेश दिला आहे. भगवान बुद्धांनी भारतीय परंपरा समृद्ध केली. ते स्वतःच आयुष्याचे दीप झाले आणि इतरांचे जीवनही प्रकाशमान केले. भगवान बुद्धांचा संदेश आपल्या आयुष्यात निरंतर आहे. बुद्ध हे फक्त नाव नाही, तर प्रत्येक मानवाच्या हृदयात धडकणारा विचार आहे. भगवान बुद्ध यांनी सांगितलेले चार मार्ग दया, करुणा, समभाव, स्वीकार भारतभूमीसाठी प्रेरणादायी आहेत. नेकांत्याग, समर्पणाची भावना म्हणजेच गौतम बुद्ध असल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
Check Also
गिरवलेचे सरपंच प्रताप हातमोडे भाजपमध्ये दाखल
पनवेल : रामप्रहर वृत्तगिरवले गावचे सरपंच प्रताप चंद्रकांत हातमोडे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी भारतीय जनता पक्षामध्ये …
RamPrahar – The Panvel Daily Paper