Breaking News

आचारसंहितेची अंमलबजावणी काटेकोरपण करा -शितोळे

अलिबाग : प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या काळात निवडणूक आयोगाच्या आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन ही जिल्ह्यातील प्रत्येक अधिकारी व कर्मचार्‍याची जबाबदारी आहे. आचारसंहिता भंग होणार नाही हे त्यांनी काळजीपूर्वक पाहावे यात कसूर केल्यास निवडणूक कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्यात येईल, असे अतिरिक्त जिल्हाधिकारी व आचारसंहिता अंमलबजावणी समितीचे प्रमुख भरत शितोळे यांनी रविवारी (दि. 17) अलिबाग येथे सांगितले.

रविवारी आरसीएफ कम्युनिटी हॉल येथे विविध मतदारसंघनिहाय स्थापन करण्यात आलेल्या पथकांना दिवसभर प्रशिक्षण देण्यात आले त्या वेळी ते बोलत होते. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे, तहसीलदार महसूल विशाल दौंडकर या वेळी उपस्थित होते. भरत शितोळे म्हणाले की, निवडणूक कामकाज प्रत्येकाने गांभीर्याने घ्यावयाचे असून निवडणूक आयोगाची प्रत्येक लहान-मोठ्या बाबींवर नजर आहे. कोणत्याही पथकाने कामात टाळाटाळ किंवा हलगर्जीपणा केलेला असल्यास तो कुठल्या पदावर आहे याचा विचार न करता तातडीने कारवाई केली जाईल. या वेळी त्यांनी पथकनिहाय प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा आढावाही घेतला. उपजिल्हाधिकारी वैशाली माने, भरारी पथकाचे प्रमुख लेखा अधिकारी शरद पाटील, व्हिडीओ सर्वेक्षण पथकाचे

प्रमुख उपमुख्य लेखा अधिकारी विकास खोळपे, लेखा पथक प्रमुख कोषागार अधिकारी फिरोझ मुल्ला, व्हिडीओ पाहणी पथक प्रमुख बाळासाहेब तट्टू, माध्यम प्रमाणीकरण व पेड न्यूज समितीचे सदस्य सचिव जिल्हा माहिती अधिकारी अनिरुद्ध अष्टपुत्रे व तहसीलदार महसूल विशाल दौंडकर यांनी एक खिडकी संदर्भात मार्गदर्शन केले. डॉ. पद्मश्री बैनाडे यांनी सर्वांनी समन्वयाने हे काम पार पाडावे, तसेच सातत्याने प्रशासनाला अहवाल द्यावेत, संपर्कात राहावे, अशा सूचना दिल्या.

Check Also

विरोधकांकडून होणारा अपप्रचार खोडून काढा; लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

पनवेल ः रामप्रहर वृत्त लोकसभा निवडणुकीप्रमाणे या विधानसभा निवडणुकीतही विरोधकांकडून स्वार्थापोटी खोटा प्रचार करून जनतेची …

Leave a Reply