83 गावे, 253 वाड्यांना टँकर्सद्वारे पाणीपुरवठा
अलिबाग ः जिमाका – रायगड जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत भीषण पाणीटंचाई जाणवू लागली आहे. आधीच उन्हाच्या काहिलीने त्रस्त असणार्या नागरिकांना या काळात पाणी समस्येला सामोरे जावे लागत आहे. संपूर्ण जिल्ह्यातील एकूण तालुक्यांपैकी उरण, पनवेल, कर्जत, खालापूर, पेण, सुधागड, रोहा, माणगाव, महाड, पोलादपूर, श्रीवर्धन, मुरूड आणि तळा या 13 तालुक्यांमधील एकूण 83 गावे, 253 वाड्या असे मिळून एकूण 336 गावे-वाड्यांमधील एकूण 68 हजार 723 नागरिकांना 35 खासगी आणि सामाजिक संस्थेच्या मदतीने 37 टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे, अशी माहिती रायगड उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्के-पाटील यांनी दिली आहे.
पाणीटंचाईसदृश परिस्थिती असलेल्या तालुक्यांतील गावे आणि वाड्यांना जिल्हा प्रशासनाकडून टँकर्स, बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. त्यानुसार उरण तालुक्यातील पाच वाड्यांमधील 998 नागरिकांना दोन खासगी टँकर्सद्वारे, पनवेल तालुक्यातील पाच गावे, सहा वाड्यांमधील एकूण चार हजार 805 नागरिकांना दोन खासगी टँकर्सद्वारे, कर्जत तालुक्यातील सात गावे, 19 वाड्यांमधील एकूण पाच हजार 951 नागरिकांना तीन खासगी टँकर्सद्वारे, खालापूर तालुक्यातील एक गाव, चार वाड्यांमधील एकूण एक हजार 550 नागरिकांना दोन खासगी टँकर्स व दोन अधिग्रहित विहिरीद्वारे, पेण तालुक्यातील 14 गावे, 86 वाड्यांमधील एकूण 22 हजार 250 नागरिकांना सात खासगी टँकर्स व एका मदतीच्या टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
तसेच सुधागड तालुक्यातील तीन गावे, पाच वाड्यांमधील दोन हजार 262 नागरिकांना एका खासगी टँकरद्वारे, रोहा तालुक्यातील चार गावे, दोन वाड्यांमधील एकूण दोन हजार 896 नागरिकांना सामाजिक संस्थेच्या मदतीच्या एका टँकरद्वारे, माणगाव तालुक्यातील चार गावे, चार वाड्यांमधील एकूण एक हजार 215 नागरिकांना दोन खासगी टँकर्सद्वारे, महाड तालुक्यातील 10 गावे, 62 वाड्यांमधील एकूण 12 हजार 211 नागरिकांना सात खासगी टँकर्सद्वारे, पोलादपूर तालुक्यातील 30 गावे, 57 वाड्यांमधील एकूण 11 हजार 230 नागरिकांना सहा खासगी टँकर्सद्वारे, श्रीवर्धन तालुक्यातील एक गाव, दोन वाड्यांमधील एकूण 348 नागरिकांना एक खासगी टँकर व दोन अधिग्रहित विहिरींद्वारे, मुरूड तालुक्यातील एका गावातील एकूण 751 नागरिकांना एका खासगी टँकरद्वारे, तळा तालुक्यातील तीन गावे, एका वाडीमधील एकूण दोन हजार 256 नागरिकांना एका खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.