
पेण ः प्रतिनिधी
निसर्ग चक्रीवादळात पेणमध्ये विद्युत महावितरण कंपनीची यंत्रणा कोलमडली असून पेण तालुक्यात व शहरात अनेक भागात अजूनही विद्युत पुरवठा पूर्ववत झालेला नाही. या पार्श्ववभूमीवर नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी विद्युत अधीक्षक अभियंता पाटील यांची भेट घेऊन शहरातील काही भागांत अजूनही विद्युत पुरवठा सुरळीत नसून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याकरिता मोठ्या प्रमाणात यंत्रणा राबवावी, असे सांगून लवकरात लवकर विद्युत पुरवठा कसा सुरळीत करता येईल व यासाठी नगर परिषदेच्या वतीने जे सहकार्य लागेल ते दिले जाईल, असे आश्वासन दिले. या वेळी त्यांच्यासोबत भास्कर पाटील, हितेश पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते. अधीक्षक अभियंता पाटील यांनी पेणमधील विद्युत यंत्रणा सुरळीत करण्यासाठी जास्तीत जास्त मनुष्यबळ वापरण्यात येत असून कल्याण येथूनही पथक पेणमध्ये आले आहे. विद्युत पुरवठा लवकरच सुरळीत होईल, असे स्पष्ट केले.