Breaking News

चक्रीवादळात राजिपचे 150 कोटींचे नुकसान

अलिबाग : प्रतिनिधी – निसर्ग चक्रीवादळामुळे खाजगी मालमत्तेचे नुकसान झाले त्याचबरोबर शासकीय मालमत्तेचे देखील मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. रायगड जिल्हा परिषदेचे (राजिप) सुमारे 150 कोटी  रुपयांचे नुकसान झाले आहे.

रायगड जिल्हा परिषदेच्या 52  पैकी  45  प्राथमिक आरोग्य केंद्रांचे नुकसान झाले आहे. नांदवी, शिरवली, निजामपूर , मेंदडी, बोर्लीपंचतन, आगरदांडा, खामगाव, बोर्लीमांडला  येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांचे जास्त नुकसान झाले आहे. सुधागड तालुक्यातील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या इमारतीचेही या वादळात नुकसान झाले आहे.

याखेरीज 78  आरोग्य उपकेंद्र, तीन जिल्हा परीषद दवाखाने, एक प्राथमिक आरोग्य पथक यांनाही वादळाचा कमी अधिक प्रमाणात फटका बसला आहे. हे नुकसान अंदाजे सहा कोटी नऊ लाख रूपये इतके आहे.

1551 शाळांचे नुकसान

निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्हा परिषदेच्या 1551 शाळांचे नुकसान झाले. 1500  शाळांचे अंशतः नुकसान झाले तर  51  शाळा  पूर्णपणे कोसळल्या आहेत. 2396 वर्गांचे नुकसान  झाले आहे. माणगाव तालुक्यात सर्वाधीक 271 शाळांची नुकसान झाले आहे. 

अलिबाग तालुक्यात 96 , उरण 18, कर्जत 174, खलपुर 55, तळा 87, पनवेल 85, पेन 103, पोलादपूर 38, महाड 87, माणगाव 263, मुरुड 77, म्हसळा 95, रोहा 134, श्रेवर्धन 86, सुधागड 103 अश्या एकूण 1500 शाळांचे अंशतः नुकसान झाले आहे.

अलिबाग दोन, कर्जत चार, खलपुर दोन, तळा तीन, पनवेल तीन, पेण पाच, पोलादपूर दोन, महाड एक, माणगाव नऊ, म्हसळा सहा, रोहा पाच, श्रीवर्धन नऊ अशा 51 शाळांचे पूर्णतः नुकसान झाले  आहे. एकूण 39 कोटी  18 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातून देण्यात आली. शाळा पडल्या असून दुरुस्तीसाठी निधी नाही. अशा परिस्थितीत शाळा सुरु कशा करायच्या हा गंभीर प्रश्न  रायगड जिल्हा परिषदेसमोर आहे.

352 ग्रामपंचायत इमरतींची पडझड

निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा ग्रामपंचायत विभागालाही बसला आहे. वादळात ग्रामपंचायतीच्या इमारतींसह, समाजमंदीर, सार्वजनिक शौचालये, स्मशानभूमींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळामुळे जिल्ह्यातील 352 ग्रामपंचायतीच्या इमरतींची पडझड झाली. तर एक हजार 93 समाजमंदीरांचे नुकसान झाले. वदाळात 691 सार्वजनिक शौचालयांची मोडतोड झाली.  एक हजार 255 स्मशानभूमी पडझड झाली आहे. 415 इतर इमारतीचे नुकसान झाले आहे. या इमारतींच्या दुरुस्तीसाठी अंदाजे 52 कोटी 62 लाख रुपयांचा निधी अपेक्षित आहे.

Check Also

अटल सेतूजवळ ‌‘शिवमुद्रा‌’ आणि ‌‘शिवस्मारक‌’ उभारणार; मंत्री आशिष शेलारांसमवेत आमदार महेश बालदींची बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्तमुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या अटल सेतूजवळ रायगडच्या दिशेला असलेल्या एका मोठ्या खडकावर भव्य …

Leave a Reply