Breaking News

काँग्रेसचे नेते लाचार, तर सत्तेच्या वाटमारीत उद्धव ठाकरेंचीही फरपट

राधाकृष्ण विखे-पाटील यांची घणाघाती टीका

शिर्डी ः प्रतिनिधी
भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली. घाटा नको, वाटा पाहिजे, असे हे राज्य सरकार असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. स्वार्थासाठी काँग्रेस नेते लाचार असून मातोश्रीचा रिमोट आता शिवसेनेच्या हाती राहिला नाही. सत्तेच्या वाटमारीत शिवसेनेचे मोठे नुकसान होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही फरपट होताना दिसते. त्यामुळे आता सत्तेत राहायचे की नाही याचा विचार शिवसेनेने करण्याची वेळ आली आहे, असेही विखे-पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले की, मी पक्ष सोडला म्हणून बाळासाहेब थोरात यांना अध्यक्षपद मिळाले. थोरातांची स्वतःची कर्तबगारी काय? थोरात म्हणजे दिशा हरवलेला माणूस असल्याचे सांगत त्यांनी निशाणा साधला. गेल्या सहा महिन्यांत त्यांनी अशी कोणती कर्तबगारी दाखवलीय, असा सवालही विखे-पाटील यांनी केला.
कोरोनासारख्या भयानक संकटातही राज्य सरकार गोंधळलेल्या अवस्थेत आहे. कोणताही निर्णय घेताना सरकारमधील तिन्ही पक्षांत समन्वय नाही. राज्य सरकारच आज संभ्रमात आहे. राज्यातील जनतेच्या प्रश्नांसाठी नाही, तर आपापसातील वाद मिटवण्यासाठी बैठका होत आहेत. काँग्रेसला एवढी लाचारी का करावी लागत आहे? स्वतःच्या स्वार्थासाठी काँग्रेसचे नेते लाचार आहेत. काँग्रेसची राज्यात वाताहत झाल्याचेही विखे-पाटील या वेळी म्हणाले.

Check Also

कोकणातील वणव्यांबाबत आमदार प्रशांत ठाकूर आक्रमक

कठोर उपाययोजना करणार -वनमंत्री गणेश नाईक पनवेल : रामप्रहर वृत्तकोकणातील आंबा व काजू बागांचे वणव्यांमुळे …

Leave a Reply