नवी दिल्ली : वृत्तसंस्था
कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी सर्व देशांतील सरकारे मोठ्या प्रमाणात प्रयत्न करीत आहे. कोरोनाच्या उपचारासाठी लसीची चाचणीदेखील अनेक देशांत करण्यात येत आहे. मात्र जोपर्यंत कोरोनावर लस तयार होत नाही तोपर्यंत सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळावा लागेल तसेच मास्कचा वापर करीत राहावा लागेल, असे स्पष्ट मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलेे.
उत्तर प्रदेशमध्ये शुक्रवार (दि. 26)पासून आत्मनिर्भर अभियानाला सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे अभियान लॉन्च केले. त्या वेळी ते बोलत होते. जागतिक गुंतवणूकदार आता उत्तर प्रदेशमध्ये येण्यास उत्सुक आहेत. येथे शांतता नांदू लागल्याने हा बदल घडला असल्याचे त्यांनी सांगितले.
युरोपातील इंग्लंड, फ्रान्स, इटली आणि स्पेन या चार देशांची लोकसंख्या एकत्र केली तर ती 24 कोटींच्या घरात जाते. आपल्या देशात एकट्या उत्तर प्रदेशची लोकसंख्या 24 कोटी आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशचा दबदबा मोठा आहे. इतकेच नाही तर कोरोना काळातील लॉकडाऊनमध्ये जे मजूर उत्तर प्रदेशात परतले आहेत, त्यांना आता इथलेच सरकार रोजगार उपलब्ध करून देत आहे. सुमारे सव्वा कोटी मजुरांना रोजगार उपलब्ध करून दिले जातील, असे आश्वासन पंतप्रधान मोदींनी दिले.
जगभरात कोरोनाचे संकट आहे, मात्र उत्तर प्रदेशने जे साहस दाखवले त्याचे कौतुक होते आहे. योगी सरकारचे काम येणार्या पिढ्याही लक्षात ठेवतील. उत्तर प्रदेश सरकारने लाखो मजुरांच्या तसेच महिलांच्या खात्यातही पैसे जमा केले. या सरकारच्या चांगल्या कामांमुळेच आज जागतिक गुंतवणूकदार उत्तर प्रदेशच्या प्रेमात आहेत, असेही पंतप्रधान मोदींनी म्हटले.
Check Also
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे -आमदार प्रशांत ठाकूर
खारघरमध्ये पर्यावरणपूरक शवदाहिनीचे लोकार्पण, प्राणी अंत्यसंस्कार केंद्राचे भूमिपूजन खारघर ः रामप्रहर वृत्तपर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपण …
RamPrahar – The Panvel Daily Paper