रेवदंडा : प्रतिनिधी
निसर्ग चक्रीवादळ येऊन एक महिना उलटून गेला तरी राज्य शासनाकडून अद्याप काही ठिकाणी नुकसानभरपाईचे वाटप झालेले नाही. अशाच प्रकारे रेवदंडा व थेरोंडा येथील चक्रीवादळग्रस्त शासकीय मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.
रेवदंडा परिसराला निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसून नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. येथील घरांची पडझड होऊन ग्रामस्थांना ऐन पावसाळ्यात बेघर होण्याची वेळ आली, तर बागायतदारांचेही कंबरडे मोडले. या पार्श्वभूमीवर तातडीने मदत देणे अपेक्षित होते, मात्र रेवदंडा व थेरोंड्यातील नुकसानग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.
राज्याचे कृषिमंत्री, ऊर्जामंत्री, महसूलमंत्री यांनी रायगड जिल्ह्याचा दौरा करून नागाव व चौलमध्ये पाहाणी केली, मात्र रेवदंडा व थेरोंड्यामध्ये यापैकी कुणीही पाहाणीसाठी आले नाही. जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दोन-तीन वेळा भेट देत पाहाणी केली खरी, मात्र येथील स्थानिक नुकसानग्रस्त बागायतदार व छपरे उडून गेलेले सर्वसामान्य यांच्याशी संवाद वा चर्चा केली नाही. त्यामुळे कोणता शुक्राचार्य मदतीच्या झारीत अडकला ज्याने रेवदंडा व थेरोंडा अजूनही शासनाच्या मदतीपासून वंचित राहिला, असा प्रश्न उपस्थित केला जात असून, लोक संप्तत झाले आहेत.
Check Also
टीआयपीएल अंडर-१९ क्रिकेट स्पर्धेचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्तसोसायटी क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजित टीआयपीएल सिझन ३ अंडर-१९ क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन …
RamPrahar – The Panvel Daily Paper