Breaking News

रिलायन्स कंपनीत कामगारांवर अन्याय

लोकशासन आंदोलन संघर्ष समितीचा आरोप व निषेध

नागोठणे : प्रतिनिधी – येथील रिलायन्स कंपनीने कोरोनाच्या महामारीचा गैरफायदा घेऊन कंत्राटी आणि कायम कामगारांवर अन्याय सुरू केलेला आहे तसेच कंत्राटी कामगारांतील कोरोना रुग्णांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या देखभालीसंदर्भात हलगर्जीपणा केला असल्याचा आरोप लोकशासन आंदोलन संघर्ष समितीने केला आहे. या संदर्भात दाद मागण्यासाठी समितीतर्फे निषेध करण्यात येऊन जून महिन्यात कंपनीचे मालक मुकेश अंबानी तसेच इतर वरिष्ठ शासकीय अधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनाची प्रत पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे यांना देण्यात आली.

या ठिकाणी समितीचे मुख्य संघटक राजेंद्र गायकवाड यांच्यासह स्थानिक संपर्क प्रमुख गंगाराम मिणमिणे, प्रमोदिनी कुथे, चेतन जाधव, मोहन पाटील व मोजके सदस्य उपस्थित होते. या वेळी समितीच्या वतीने कंपनीचा निषेध करताना त्यांनी असहकाराची भूमिका बजावणार्‍या काही विशिष्ट अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली.

कंपनीच्या अग्निशमन दलात काम करणारे गंगाराम मिणमिणे यांनी वरिष्ठ अधिकारी विनय किर्लोस्कर यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. या वेळी राजेंद्र गायकवाड यांनी दोन दिवसांत कारवाई न झाल्यास पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा दिला.

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply