धाटाव : प्रतिनिधी
रोहा तालुक्यातील तांबडी येथील अल्पवयीन मुलीच्या बलात्कार व खून प्रकरणासंदर्भात मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला असून, राज्यभरातील समन्वयकांनी सोमवारी (दि. 11) रोहा येथे महत्त्वपूर्ण बैठक घेतली. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घटनास्थळी अद्याप भेट दिली नसल्याने या वेळी उपस्थितांनी नाराजी व्यक्त केली, तर तपासात दिरंगाई, दुर्लक्ष झाल्यास थेट मंत्रालयावर मराठा क्रांती मोर्चाचा भव्य मोर्चा निघेल. याची राज्य सरकारने दखल घ्यावी, असा इशारा राज्य समन्वयक संभाजी पाटील यांनी दिला.
या बैठकीला राज्य समन्वयक पाटील यांच्यासह रामभाऊ गायकवाड, महेश डोंगरे, सुनील नागणे, रायगड समन्वयक विनोद साबळे, स्थानिक अध्यक्ष आप्पा देशमुख, नितीन परब, स्नेहा अंबरे, हेमंत देशमुख, समीर शेडगे, सुहास येरुणकर, अनंत देशमुख व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
तांबडीची घटना भयानक आहे. या भगिनीला न्याय मिळण्यासाठी अधिकार्यांना भेटणे, निवेदन देणे फार उपयोगाचे नाही. थेट मंत्रालयावर मोर्चा काढू, असे संभाजी पाटील यांनी स्पष्ट केले, तर अत्याचारात अजून कोणी मास्टरमाइंड आहे का असा सवाल करून तपासावर आम्ही समाधानी नाहीत, असे रायगडचे समन्वयक विनोद साबळे म्हणाले.
तांबडी अत्याचार प्रकरण हे दुसरी कोपर्डीची घटना वाटावी असेच आहे. पीडित कुटुंब भयभीत आहे. त्यांच्यावर दबाव आणला जात आहे. आरोपीला जात-धर्म नसतो. कोपर्डी घटनेत दोषींना फाशी दिली असती तर तांबडी येथे ही घटना घडली नसती, असे बैठकीत अनेकांनी नमूद केले. त्यानंतर सर्व पदाधिकार्यांनी तांबडी येथे जाऊन पीडित कुटुंबाचे सात्वंन केले.
Check Also
पनवेल भाजी मार्केटमध्ये इनरव्हील क्लबतर्फे कापडी पिशव्यांचे व्हेंडिंग मशीन
पनवेल ः रामप्रहर वृत्तपर्यावरण संरक्षण आणि प्लास्टिकमुक्तीचा संदेश देण्यासाठी इनरव्हील क्लब ऑफ पनवेलतर्फे शहरातील कृष्णाळे …
RamPrahar – The Panvel Daily Paper