पोलादपूर : प्रतिनिधी – पावसाचे हस्त नक्षत्र शिल्लक असताना पोलादपूर तालुक्याने यंदा सरासरीच्या 98.54 टक्के सरासरी गाठली. दरवर्षी समाधानकारक पाऊस पडत असताना उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवते. ती दूर करण्यासाठी आतापासूनच व्यापक प्रयत्न सुरू करण्याची गरज आहे.
पोलादपूर तालुक्याचे सर्वसाधारण पर्जन्यमान 3680 मिलीमीटर असून, दरवर्षीच्या सरासरीच्या 98.54 टक्के सरासरी गाठली आहे. यंदा केवळ 11 दिवस शंभर मिमीपेक्षा अधिक, तर एक दिवस 200 मिमीपेक्षा पाऊस पडल्याची नोंद असूनही सरासरी गाठली गेली आहे.
गेल्या वर्षीचा अपवाद वगळता तालुक्यातील ही सरासरी कायमच असते. गत वर्षी मूबलक पर्जन्यमान असूनही लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जलनियोजन झाले नाही. परिणामी 2020च्या उन्हाळ्यात कोरोनाच्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पोलादपूर तालुक्यातील ग्रामीण भागात आलेल्या चाकरमानी व स्थानिक ग्रामस्थांना टँकरद्वारे पाणीपुरवठा तसेच नद्यांचे डोह, पाणवठे व बुडके आदींवर अवलंबून राहावे लागले. याखेरिज वर्ल्ड बँकेच्या सौजन्याने ग्रामीण भागासाठी मिळालेल्या पाऊसपाणी संधारणाच्या साठवण टाक्या, तालुका कृषी विभाग आणि स्वदेस फाऊंडेशनच्या माध्यमातून झालेले साठवण तलाव यशस्वी असून, नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून साकारलेला आडावळे बुद्रुकचा बंधाराही यंदा पुरेसा ओव्हरफ्लो झाला आहे. तालुक्यातील एमआयडीसीचे राजबाजिरे धरणदेखील लवकर ओव्हरफ्लो झाल्याने उर्वरित कालावधीत नियोजनबद्ध वापर न झाल्यास लवकर रिकामे होण्याचीही शक्यता आहे.
पोलादपूर तालुक्यातील पाणीटंचाई निवारण आराखड्यावरील कृती पंचायत समिती आणि तहसील कार्यालय या दुहेरी यंत्रणांमार्फत होत असताना राजकीय प्रभावाने पाणीटंचाईच्या वस्तुस्थितीवर लॉकडाऊन काळात पांघरूण घालण्याचे प्रयत्न केले गेले, मात्र जनतेच्या मागणीला अशा रितीने उपेक्षित करण्याच्या प्रयत्नांपेक्षा नियोजनाची गरज लक्षात घेण्याची गरज जिल्हा व राज्यातील सत्ताधीशांना वाटलेली दिसून आली नाही.
तालुक्यात सुमारे 76 गावे व वाड्यांमध्ये पावसाळ्याच्या अखेरीस साडेतीनशेच्या आसपास संख्येने वनराई बंधारे बांधून गुरे, कपडे धुणे तसेच भाजीपाला कडधान्य शेतीसाठी पाणी अडवा पाणी जिरवा संकल्पना दरवर्षी राबविली जाते. यामध्ये लोकसहभाग कमी असतो, परंतु यंदा मोठ्या संख्येने चाकरमानी लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर गावागावांमध्ये वास्तव्याला आले असताना ग्रामविकासाच्या प्रयत्नांना सहभाग वाढण्याची शक्यता आहे. प्रशासनाने ग्रामस्थांच्या मदतीने बंधारे बांधण्याकामी सुसज्जता ठेवण्याची गरज आहे.