मुंबई : प्रतिनिधी
वडाळ्याच्या हिरामणी तिवारीचे मुंडन, ठाण्यात कर्तव्यावरील महिला पोलिसावर हल्ला, आता निवृत्त नेव्ही अधिकार्याला मारहाण… पक्षाची भूमिका काय? तर म्हणे, संतप्त, उत्स्फूर्त प्रतिक्रिया, पण इथे कायद्याचे राज्य आहे ना? की एका बबड्याच्या फायद्याचे?, असा सवालवजा टोला आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेला लगावला आहे. महाराष्ट्र हे कायद्याचे राज्य आहे. कायदा हातात घेणारे कोणीही असले तरी त्यांची गय केली जाणार नाही. हेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे धोरण असल्याचे शिवसेना नेते व मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी पत्रक काढून म्हटले होते. आता निवृत्त नौदल अधिकार्याला शिवसैनिकांनी मारहाण केल्यानंतर राऊत यांनी या घटनेचे समर्थन केले आहे. त्यावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्विट करून शिवसेनेला लक्ष्य केले आहे. दुसरीकडे वयोवृद्ध माजी नौदल अधिकार्याला सहा-सात जणांनी मिळून केलेली मारहाण जनतेला भुरट्या गुंडांचा ’षंढपणा’ वाटत असली तरी शिवसेनेच्या प्रवक्त्यांना मात्र ती ’संतप्त व उत्स्फूर्त’ प्रतिक्रिया वाटत आहे. विश्वास ठेवा हा ठाकरे सरकार पुरस्कृत दहशतवाद एक दिवस जनताच पूर्ण ताकदीने ठेचून काढेल, अशा शब्दांत भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी सुनावले आहे.दरम्यान, मारहाण झालेले मदन शर्मा यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ’मी जखमी आहे व तणावात आहे. जे घडले ते अतिशय दु:खद आहे. मला उद्धव ठाकरेंना एक गोष्ट अतिशय स्पष्ट शब्दांत सांगायची आहे की, तुम्हाला कायदा-सुव्यवस्था राखता येत नसेल तर राजीनामा द्या. ही जबाबदारी कोणाला द्यायची ते लोकांना ठरवू दे,’ असे म्हटले होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper