शेतात चर खोदाई व थेट झोडणीला प्राधान्य
माणगांव : प्रतिनिधी
ऑक्टोबर महिन्याच्या मध्यापर्यंत सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतकर्यांच्या चिंता वाढविल्या असून, तयार झालेले भातपिक वाचविण्यासाठी त्यांना धावपळ करावी लागत आहे.
या वर्षी दमदार पावसामुळे माणगाव तालुक्यात भातपिक जोमदार आले होते. मात्र परतीच्या पावसाने भातपिकाला झोडपले असून, पावसाचे पाणी शेतात साचून राहत असल्याने पिकाची काडी कमकुवत होत आहे. त्याचा भाताच्या लोंबीवर परिणाम होत आहे. तसेच उभे पिक शेतातील पाण्यात आडवे झाल्याने ते कुजत आहे. हे तयार भातपिक वाचविण्यासाठी शेतकर्यांची धावपळ सुरू आहे. साठलेल्या पाण्याचा निचरा व्हावा, म्हणून शेतकरी शेतात चर काढत आहेत.
अगदीच तयार झालेल्या भात पिकाची थोड्या थोड्या प्रमाणात कापणी करून त्याची लगेचच झोडणी केली जात आहे. तयार पीक पुर्णपणे वाया जाणार नाही, यासाठी उपाययोजना करताना शेतकर्यांना मोठी धावपळ करावी लागत आहे. त्यात शेतकर्यांना आर्थिक फटकाही बसत आहे.
पावसाचे पाणी शेतात तुंबून राहिल्याने तयार भातपिकाचे नुकसान होते आहे. शेतातील पाणी चर खोदून बाहेर काढावे लागत आहे. जास्त तयार भातपिक थोडेथोडे कापून, त्याची झोडणी करावी लागत आहे. त्यासाठी जादाचे मजुर लागत आहेत. त्यामुळे आर्थिक फटकाही बसत आहे.
-नारायण शेपुंडे, शेतकरी, माणगाव
RamPrahar – The Panvel Daily Paper