Breaking News

शरद पवारांकडे सरकार चालवण्याचे कॉन्ट्रॅक्ट; चंद्रकांत पाटील यांची टीका

सांगली ः प्रतिनिधी

राज्यातील विविध समस्यांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून काय उपयोग? सध्या शरद पवार हेच राज्य चालवतात. त्यामुळे त्यांनाच भेटले पाहिजे. शिवाय मुख्यमंत्र्यांपेक्षा राज्यपाल व शरद पवार हेच भेटीसाठी जास्त उपलब्ध असतात, अशी खोचक टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी (दि. 29) सांगलीत पत्रकार परिषदेत बोलताना केली. मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर त्यांनी पुन्हा निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्याशी सरकार चालवण्याचे कॉन्ट्रॅक्ट केले आहे. पवारच सध्या सरकार चालवतात. त्यामुळे एखाद्या प्रश्नासाठी पवारांनाच भेटले पाहिजे, असे पाटील म्हणाले. दरम्यान, पंकजा मुंडे यांनी नुकतेच शरद पवारांचे कौतुक केले होते. त्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आले होते. चंद्रकांत पाटील यांना त्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, पंकजा मुंडेंनी शरद पवारांचे कौतुक केले ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. मुख्यमंत्री बाहेर पडत नाहीत, मात्र शरद पवार बाहेर पडतात याचे कौतुक आहे. हीच महाराष्ट्राची संस्कृती आहे. जयंत पाटील यांनीही सांगलीत भाजपच्या नेत्यांचे कौतुक केले आहे, याची आठवणही प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी करून दिली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वाढीव वीज बिलांच्या मुद्द्यावर नुकतीच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्या वेळी कोश्यारी यांनी राज ठाकरेंना शरद पवारांना भेटण्याचा सल्ला दिला. त्याबाबत विचारले असता माझ्या एकाही पत्राला मुख्यमंत्री कार्यालयातून उत्तर आले नाही. त्यामुळे राज्यपालांनी राज यांना दिलेला सल्ला योग्यच आहे, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या वेळी स्पष्ट केले.

Check Also

पनवेलच्या ग्रामीण भागात सभापती, उपसभापतींचा अधिकाऱ्यांसमवेत दौरा

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल पंचायत समितीमधून शेतकरी कामगार पक्षाची सत्ता जाऊन प्रथमच भारतीय जनता पक्षाचा …

Leave a Reply