पनवेल : वार्ताहर
सायबर गुन्हेगारी वाढत चालली आहे. वेगवेगळ्या मार्गाने लोकांची फसवणूक होत आहे. हे सर्व मोबाइल, ई-मेल, व्हॉट्सअॅप, फेसबुक आदी सोशल मीडियाच्या माध्यमातून होत आहे. हे टाळण्यासाठी सर्वांनी सतर्कता बाळगणे व आपले सर्व व्यवहार गोपनीयतेने करणे गरजेचे असल्याचे मत नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी व्यक्त केले.
परिमंडळ 1 व परिमंडळ 2 हद्दीतील विविध पोलीस ठाण्यांत आता सायबर गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक जण फोनवरून संपर्क साधून बँकेतून बोलत आहे असे सांगून आपली माहिती काढत आहेत. त्याचप्रमाणे सोशल मीडिया, मोबाइल, ई-मेल, व्हॉट्सअॅप, फेसबुक आदींद्वारे हॅकिंग करून माहिती घेतली जात आहे. त्या माध्यमातून आपल्या खात्यातील पैसे काढून घेतले जात आहेत. यामध्ये परराज्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी आहेत. नायजेरियनसुद्धा यात सक्रिय आहेत.
हे टाळण्याासाठी नागरिकांनी आपल्या मोबाइलमधील माहिती इतरांना देण्याचे टाळावे. पैसे काढताना आणि भरतानासुद्धा काळजी घ्यावी. एटीएममध्ये जाताना सतर्कता बाळगावी. बक्षीस लागले आहे, पेटीएम व वेगवेगळ्या योजनांमध्ये सहभागी होण्यासाठी तुमची माहिती पाठवा अशा प्रकारचे येणारे फोन टाळावेत. आपली माहिती त्यांना देऊ नये, असे आवाहनही नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी केले आहे.