पनवेल : रामप्रहर वृत्त – चोरीला गेलेली वाहने पुन्हा जप्त केल्यानंतर चोरट्यांनी त्यात फेरबदल केल्याचे समोर येते. अशाच प्रकारातून ताबा नाकारल्याने अनेक वर्षांपासून वाहने धूळ खात पडून आहेत. निकालाच्या प्रतीक्षेत असलेली ही जप्तीची वाहने भंगार बनली आहेत.
पोलीस ठाण्यालाच अपुरी जागा असल्याने जप्तीची वाहने ठेवण्यासाठी जवळपासच्या मोकळ्या जागेचा वापर होत आहे. त्यामुळे जागोजागी अशी जप्तीची वाहने उभी केलेली असतात. पोलीस ठाण्याच्या समोरच उपलब्ध जागेत विविध गुन्ह्यांत जप्त केलेली वाहने उभी करण्यात आली आहेत. यामुळे अस्वच्छता पसरली असून पोलिसांनाही अडचण होत आहे.
एखाद्या गुन्ह्यात वाहनांचा वापर झाला असल्यास ते वाहन जप्त केले जाते. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अशी वाहने पोलिसांच्या ताब्यात ठेवावी लागतात. परंतु न्यायालयीन प्रक्रिया लांबत गेल्यास वातावरणातील बदलामुळे या वाहनांची झीज होते. कालांतराने वाहनमालक अशा वाहनांकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे पडून राहणारी वाहने लिलावात काढण्यासंबंधी वरिष्ठांना कळवले जाते, असे कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सतीश गायकवाड यांनी सांगितले.