Breaking News

केंद्राच्या बदनामीलाच ठाकरे सरकारचे प्राधान्य; भाजपच्या आशिष शेलारांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी

जनहिताच्या निर्णयांच्या बाबतीत भाजप नेहमीच राज्यातील सरकारच्या सोबत आहे, पण दुर्दैवाने राज्यातील महाविकास आघाडी सरकार राजकीय हित डोळ्यांसमोर ठेवून निर्णय घेते. पंतप्रधान मोदींचा मत्सर आणि केंद्र सरकारची बदनामी याच निकषांवर राज्य सरकारचा कारभार सुरू आहे, असा आरोप माजी मंत्री, आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी केला. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यातील करोना स्थितीवरून त्यांनी ठाकरे सरकावर टीकेची तोफ डागली. ’राज्यातील फ्रंटलाइन कर्मचार्‍यांचे लसीकरणही अद्याप पूर्ण झालेले नाही असे आजच समोर आले आहे, तसेच 40 टक्के फ्रंटलाइन वर्कर्सना दुसरा डोस उपलब्ध होत नाही. तिसरीकडे ज्येष्ठ नागरिक आणि 45 वर्षांवरील नागरिकांना वणवण करावी लागत आहे, तर 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लसच देऊ शकत नाही असे सरकार सांगत आहे. राज्य सरकारचा नियोजनशून्य कारभार यासाठी जबाबदार आहे, असे शेलार म्हणाले. फ्रंटलाइन कर्मचार्‍यांना प्राधान्याने लस देण्याच्या सूचना केंद्र सरकारने केल्या होत्या. ते काम आजपर्यंत पूर्ण झालेले नाही. किमान जनतेच्या हिताचे निर्णय तरी घ्या. राजकीय लाभ बाजूला ठेवून जनहिताला प्राधान्य द्या, असे आवाहन शेलार यांनी या वेळी केले.

नाना पटोले हे तर विनोदी कलाकार

नाना पटोलेंच्या रुपाने महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला विनोदी कलाकार अध्यक्ष लाभले आहेत. त्यांच्या आजपर्यंत झालेल्या प्रत्येक पत्रकार परिषदेचा विषय मोदी, मोदी आणि मोदी हाच आहे. पटोले हे विनोदी कलाकार आहेत. त्यांना गांभीर्याने घ्यायची गरज नाही, असे आशिष शेलार म्हणाले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply