अलिबाग : प्रतिनिधी
मत्स्यव्यवसाय विभाग आयुक्तालयाच्या आदेशानुसार 1 जून ते 31 जुलै या कालावधीत खोल समुद्रात मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे कोळी बांधवांनी आपल्या बोटी किनार्यावर आणण्यास सुरुवात केली आहे. शनिवारी (दि. 29) अलिबाग तालुक्यातील नवेदर नावगाव येथील कोळी बांधवांनी आपल्या बोटी किनार्यावर आणल्या.
समुद्रात 1 जूनपूर्वी मासेमारीस गेलेल्या सर्व बोटी 31 मेपर्यंत बंदरात पोहचणे आवश्यक आहे. 1 जूननंतर कोणत्याही परिस्थितीत बंदरात मासे उतरविण्यास परवानगी असणार नाही, असे शासकीय आदेशात म्हटले आहे. त्यामुळे नौका किनार्यावर आणण्याची लगबग कोळीवाड्यामध्ये सुरू आहे.
अधिक मनुष्यबळ आणि खर्चिक असणार्या पारंपरिक पद्धतीमुळे कोळी बांधव आपल्या बोटी किनार्यावर आणण्यासाठी आता यंत्राचा वापर करू लागले आहेत. अलिबाग तालुक्यातील नवेदर नावगाव येथील कोळी बांधव मागील काही
वर्षांपासून यंत्राच्या साह्याने बोटी किनार्यावर आणतात. शनिवारी नवेदर नावगाव येथील बोटी क्रेनच्या साह्याने किनार्यावर आणण्यात आल्या.
महाराष्ट्र सागरी मासेमारी नियम अधिनियम 1981 अंतर्गत मासेमारी बंदी कालावधी 1 जून ते 31 जुलै (दोन्ही दिवस धरून 61 दिवस) करण्याकरिता केंद्र शासनाने आदेश निर्गमित केले आहेत. या आदेशानुसार राज्याच्या सागरी जल क्षेत्रात किनार्यापासून 12 सागरी मैलांपर्यंत यांत्रिक मासेमारी नौकांना पावसाळी मासेमारी बंदी लागू करण्यात आली आहे. ही पावसाळी मासेमारी बंदी पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणार्या बिगर यांत्रिकी नौकांना लागू राहणार नाही.