पुणे ः प्रतिनिधी
सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातील सर्वच पक्ष आक्रमक झाले आहेत. ओबीसींसाठी संघर्ष करण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी असल्याचे राज्याचे ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवर यांनी म्हटले आहे. ओबीसी मंत्रालयाला स्टाफ नसणे, निधीची तरतूद नसणे चिंताजनक असून अजित पवार व धनंजय मुंडेंकडे याबाबत वारंवार विचारणा करावी लागत असल्याचे सांगत त्यांनी सरकारला घरचा अहेर दिला, तर वाघ असला तरी आमचाच आहे, असे म्हणत शिवसेनेलाही कोपरखळी मारली.
ओबीसी आरक्षणाचा फैसला होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणे योग्य नसल्याची भूमिका त्यांनी पुन्हा एकदा मांडली. त्यात राज्यात सध्या कोरोनाच्या तिसर्या लाटेची भीती असताना निवडणूक आयोगाने ही पोटनिवडणूक रद्द करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्रात यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यास त्याची जबाबदारी निवडणूक आयोग घेणार का, असा सवालही त्यांनी केला. सध्या पक्षाची झूल बाजूला ठेवून सर्वपक्षीयांनी एकवटले पाहिजे. ओबीसींच्या बाजूने बोलतो, त्यांच्या हक्काची लढाई लढतो म्हणून आपल्याला दररोज धमक्या दिल्या जातात, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.
Check Also
पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव
खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …